थोरांदळे ग्रामस्थांचे मंचर पोलिसांना निवेदन
मंचर-थोरांदळे-रांजणी रस्त्यावर झालेल्या अपघातात चार जणांना प्राण गमवावे लागले. हा अपघात अवैध वाहतुकीमुळे झाला असल्याने अवैध वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी थोरांदळे येथील ग्रामस्थांनी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. अनेक जीप, रिक्षा चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करतात. अवैध वाहतुकीमुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. नुकताच थोरांदळे ते रांजणी या रस्त्यावर प्रवाशी रिक्षा व पिकअपचा मोठा अपघात होऊन या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. याबाबतचे निवेदन थोरांदळे गावचे माजी उपसरपंच मंगेश टेमगिरे, विकास मिंडे, ग्रामपंचायत सदस्य सोपान घुले आणि जाधववाडीचे माजी सरपंच मंगेश जाधव यांनी मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना दिले आहे. यावेळी अवैध वाहतुकीवर कारवाई करु, असे आश्वासन खराडे यांनी दिले आहे.