सातारा -कारी (ता. सातारा) येथील काही युवकांना शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयासमोर खोटे बोलण्यास भाग पाडले. काहीही मुद्देमाल, जंगली प्राण्याचे अवशेष अथवा शिकारीसाठी लागणारी काठी, बरसा अथवा अन्य शस्त्र त्यांच्याकडे सापडले नाही. तरीही खोट्या गुह्यात अडकवून युवकांना नाहक त्रास देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या सातारा वन विभागाच्या अधिकारी शीतल राठोड आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांची कायदेशीर चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्याकडे केली आहे. लोकांना नाहक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची मुजोरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कारी येथील प्रकाश जिमन, निलेश जिमन, दीपक किर्दत, विश्वास किर्दत, विकास जिमन आणि मालदेव वस्ती, ठोसेघर येथील गंगाराम पांढरमिसे यांच्यावर वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड, वनपाल योगेश गावित, राजकुमार मोसलगी, मारुती माने, रणजीत काकडे, वाहनचालक धनंजय लादे यांनी मारहाण करुन खोटा गुन्हा दाखल केला. याबाबत संबंधित युवकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करुन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपवनसंरक्षक हाडा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
मालदेववस्ती येथे दि. 12 मे रोजी पांढरमिसे यांच्या घरुन जेवण करुन कारी येथील प्रकाश जिमन, निलेश जिमन, दिपक किर्दत, विश्वास किर्दत, विकास जिमन परत गावी जात असताना रात्री 10.50 च्या सुमारास विकास जिमन व दीपक किर्दत या दोघांना राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सज्जनगड फाटा येथे अडवून मारहाण केली. नंतर त्यांनी युवकांचाच फोन घेऊन इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले. पांढरमिसे आणि शीतल राठोड यांचा पूर्वीचा वाद असल्याने राठोड यांनी जुन्या रागातून या युवकांना मारहाण केली. तसेच आता तुम्हाला चांगलेच अडकवते, असे म्हणून या सर्वांवर शिकारीचा खोटा गुन्हा दाखल केला. सर्वांना अटक करुन त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या.
कोर्टासमोर गुन्हा कबुल करण्यासाठी खोटे बोला अन्यथा जीवे मारु, अशी धमकीही दिली असल्याची तक्रार युवकांनी केली आहे. तसेच कोर्टाने आदेश देऊनही जप्त केलेल्या दुचाक्या आणि मोबाईल राठोड यांनी युवकांना परत केले नाहीत. कायदा पायदळी तुडवून मुजोरी आणि मनमानी करणाऱ्या राठोड आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल करुन शिवेंद्रसिंहराजे यांनी या सर्वांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हाडा यांच्याकडे केली. चौकशी करुन कारवाई करु, असे हाडा यांनी सांगितले. दरम्यान, शिकार करणारांवर कडक कारवाई करा. पण, निष्पाप लोकांवर शिकारीचे खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना त्रास देवू नका. असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.