अकोला – वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या 15 दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टीमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. लवकर निर्णय झाला नाही तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे, असल्याचे मोठे वक्तव्यही यावेळी आंबेडकरांनी केले आहे. ते अकोल्यात बोलत होते. भारत राष्ट्रीय समितीसोबत संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचे हे विधान सूचक मानले जात आहे.
आंबेडकर म्हणाले, वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी काय बोलणे झाले आहे ते स्पष्ट करावे. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही.
आंबेडकरांनी यावेळी कॉंग्रेससोबतच्या सध्याच्या बोलणीवर “थॅंक्यू’ म्हणत बोलणे टाळले. तर दुसरीकडे, राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर त्यांची स्तुती केली आहे. अजित पवार “जे ओठात, तेच पोटात असणारा नेता’ असल्याची स्तुतीसुमने आंबेडकरांनी उधळली आहेत.
राजकारणातील रणछोडदास उघड
शरद पवारांवर होत असलेल्या “पेरलं तेच उगवलं’ या आरोपांमध्ये तथ्य नाही. राजकारणात परिस्थितीनुरूप राजकीय तोडफोडीचे निर्णय घ्यावे लागतात. पवारांनी आतापर्यंत राजकारणासाठी जे केलंय ते आता त्यांच्यासंदर्भात घडले आहे. राजकारणातले “रणछोडदास’ सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे समोर आले आहेत. चौकशांच्या छायेखालची लोके अजित पवारांसोबत गेली, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.