नवी दिल्ली – येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेध जगभरातील क्रिकेट रसिकांना लागले आहेत. विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ देखील मागील अनेक दिवसांपासून या विश्वचषकासाठी सराव करीत होता. या स्पर्धेसाठी भारतीय संघ गुरुवारी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. आता भारतीय संघाने “मिशन वर्ल्ड कप’ हाती घेतले आहे.
यावर्षीचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार असून 2022च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला सुपर-12च्या गट-2मध्ये स्थान देण्यात आले आहे. या विश्वचषकातील जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे.
Picture perfect 📸
Let’s do this #TeamIndia@cricketworldcup, here we come ✈️ pic.twitter.com/XX7cSg3Qno
— BCCI (@BCCI) October 5, 2022
भारतीय संघाला सुपर-12 च्या गट-2 मध्ये स्थान देण्यात असून या गटात भारतीय संघासोबत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. भारतीय संघाने घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेसाठी कामगिरीतील काही गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. यामध्ये सामन्यातील अखेरच्या षटकांत येत असलेले अपयश दूर करण्याचे सर्वात मोठे आव्हान रोहित आणि कंपनीसमोर राहणार आहे.
आशिया करंडक स्पर्धेनंतर मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघाला अखेरच्या षटकांत धावा रोखण्यात तसेच फलंदाजी करताना धावांचा वेग वाढवण्यात अपयश आले. हीच गोष्ट सध्या कर्णधार रोहितची सर्वात मोठी चिंता बनली आहे.
पाठीच्या दुखण्यामुळे टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला मुकलेल्या जसप्रीत बुमराहच्या जागी अर्शदीप सरस कामगिरी करेल असा विश्वास रोहितने व्यक्त केला. अर्शदीप नवखा असला तरीही त्याच्याकडे बुमराहसारखाच परिणामकारक यार्कर आहे. यामुळेच अखेरच्या षटकांत धावा रोखण्याची जबाबदारी तो समर्थपणे हाताळू शकतो.
– रोहित शर्मा, कर्णधार
“लास्ट ऍक्शन हिरो’चा शोध
प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल या गोलंदाजांनाही अखेरच्या षटकांत धावा रोखण्यात अपयश येत आहे. त्यातच ही मालिकाच नव्हे तर विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवायचे असल्यास डेथ ओव्हर्समध्ये भेदक मारा करावा लागणार आहे. अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाज सातत्याने महागडे ठरत आहेत. अशा स्थितीत भारताला गोलंदाजांमध्ये “लास्ट ऍक्शन हिरो’चा शोध घ्यावा लागणार आहे.