मुंबई -अमिराती व ओमानमध्ये होत असलेल्या विश्वकरंडक टी-20 स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या जर्सीवर अखेर पाकिस्तानने भारताच्या नावाचा उल्लेख केला. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असून, त्यांचे नाव सगळ्याच देशांच्या जर्सीवर होते.
मात्र, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने जाणूनबूजून भारताचे नाव टाकण्याऐवजी यूएई असे नाव टाकले होते. त्यानंतर बीसीसीआयने ताशेरे ओढल्यानंतर पाक मंडळाने दिलगिरी व्यक्त करत आपली चूक सुधारत भारताचे नाव आपल्या जर्सीवर टाकले.
या स्पर्धेत येत्या 24 ऑक्टोबरला या दोन संघात सामना होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या जर्सीवरून चांगलीच चर्चा सुरू झाली होती. स्पर्धा जरी अमिराती व ओमानमध्ये होत असली तरीही त्याचे यजमानपद भारताकडे असल्याने प्रत्येक संघाने आपल्या जर्सीवर भारताचे नाव टाकणे गरजेचे होते.
पाकिस्तान मंडळाने मात्र याबाबत खोडसाळपणा केला होता. बीसीसीआयच्या तंबीनंतर ते ताळ्यावर आले असून, जागतिक क्रिकेटवर अधिराज्य असलेल्या बीसीसीआयने पाकचा नक्षा उतरवला व त्यांना जर्सीवर भारताचे नाव टाकायला भाग पाडले.