कोपरगाव – गेल्या अनेक वर्षानुवर्षे नाशिक शहराचे गटार मिश्रित गढूळ पाणी पिणाऱ्या कोपरगावकरांना निळवंडे धरणातून बंद पाइपलाइन योजनेद्वारे अतिशय स्वच्छ, निर्मळ, व मुबलक पाणी दररोज मिळेल. तसेच या योजनेमुळे कोपरगाव पालिकेचा पाण्याच्या शुद्धीकरणावर होणाऱ्या खर्चात बचत होणार असल्याचे मत कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली.
भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून ही पाणीपुरवठा योजना नगरपालिकेला बिगर खर्चिक मिळाली असून हे शहरवासियांचे भाग्य आहे. मुळ योजना फक्त शिर्डीपर्यंत होती. परंतु माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत कोपरगाव निळवंडे पाणीपुरवठा योजनेस जोडून घेतले. त्याचाच फायदा कोपरगावकरांना होणार आहे. 21 दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेल्या पालिकेवर ही योजना झाल्यानंतर पुन्हा तशी वेळ येणार नाही, असे सरोदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, निळवंडे धरण लाभक्षेत्रातील 182 गावांच्या लोकांनी या पाणीपुरवठा योजनेला विरोध करून न्यायालयामधून स्थगिती मिळविली होती. मात्र, माजी आमदार कोल्हे यांच्या सहकार्याने नगरपालिकेच्या वतीने न्यायालयात पालिकेच्या वतीने बाजू मांडली. पाणीप्रश्न सोडविण्यात यश मिळाले. यासाठी पालिकेला आत्तापर्यंत न्यायालयीन प्रक्रियेसाठी सात लाख रुपये खर्च झाला. आणखी वकिलांची फी देणे बाकी आहे. मात्र भविष्यात होणारा पालिकेचा मोठा खर्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाचला आहे. त्याबद्दल कोल्हे यांच्या पाण्याच्या तळमळी बद्दल कौतुक केले.
दरम्यान, कोपरगावकरांना जरी मुबलक पाणी मिळाले तरी शहरातील पाण्याची वितरण व्यवस्थेचा अभाव असल्याने दररोज पाणीपुरवठा करण्याची इच्छा असून हि तांत्रिक अडचणीमुळे हे शक्य होणार नाही. त्यासाठी शहरातील वितरण व्यवस्थेत मोठा बदल करणे भविष्यात गरजेचे ठरणार आहे.
49 कोटी नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत नव्या वाहिन्याद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी हि स्थानिक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करीत आपापल्या सोयीने वेगवेगळे व्हॉल्व बसवून घेतल्याने एकाचा वेळी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही, अशी खंत सरोदे यांनी व्यक्त केली. येत्या काही दिवसात निळवंडेचे पाणी कोपरगावच्या नागरिकांना मिळणार असल्याने गोदावरी खोऱ्यातून पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणातून मिळणारे पाणी जलसंपदा विभाग बंद करणार. त्यामुळे भविष्यात येसगाव येथे साठवण तलाव तयार करण्याची गरज भासणार नाही.
पाणीपट्टी देखील होणार कमी
नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून आलेल्या पाणी बिलापोटी पालिकेला जलसंपदा विभागाकडे वाढीव पैसे दरवर्षी भरावे लागतात. जलसंपदा विभाग धरणातून एकूण सोडलेल्या पाण्यावरती पाणीपट्टी आकारात होती. मात्र सोडलेल्या पाण्यापैकी 75 टक्के पाण्याचा अपव्यय होतो. 25 टक्के पाणी मिळून 100 टक्के पाणीपट्टी भरावी लागत आहे. परंतु निळवंडे धरणातून पाणीयोजना झाल्यास पाणीपट्टीची रक्कम कमी होईल.