कोल्हापूर – केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची हुंकार यात्रा शनिवार दि. 16 पासून सुरू होत आहे. याची सुरवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्म भुमी असलेल्या देवराष्ट्र येथून करण्यात येणार असून यानंतर पहिला शेतकरी मेळावा नांदणी (ता. शिरोळ)येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित केल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे सचिव डॉ. महावीर अकोळे यांनी दिली. यावेळी जीपचे माजी बांधकाम सभापती अनिल ऊर्फ सावकर मादनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
माहिती देताना डॉ. अक्कोळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत आहे. या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्यामध्ये जनजागृतीसाठी हुंकार यात्रेचे आयोजन केले आहे.सध्या काही पिकांना हमी भाव दिला आहे. मात्र सर्वच पिकांना हमी भाव मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे.
शेतीला दहा तास दिवसा वीज द्यावी, ही प्रमुख मागणी असून भारनियमन त्वरित मागे घ्यावे. हा आमचा आग्रह राहील. एफ आर पी चे बेकायदेशीर तुकडे पडले आहेत. एक रकमी बिल दिले गेलेच पाहिजे. केंद्र सरकारने भूमि अधिग्रहण कायदा मागे घ्यायला आपण भाग पाडले मात्र हाच कायदा वेगळ्या रूपात महाराष्ट्र शासन आणत आहे. त्यामध्ये भूमी अधि ग्रहण रक्कम खूपच कमी आहे ते त्वरित मागे घ्यावे. गेल्या काही वर्षात एफ आर पी ची रक्कम 100 रुपये वाढले आहे. त्याचबरोबर उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा काहीही फायदा झालेला नाही. नाहीतर किमान खताच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
आजपर्यंत स्वाभिमानी च्या माध्यमातून विविध आंदोलने यशस्वी केली आहेत. पुन्हा एकदा स्वबळावर आम्ही मैदानात उतरत आहोत.आता आम्हाला कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नाही आम्ही आमची ताकद केंद्र व राज्य सरकारला दाखवू असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी स्वागत तालुकाध्यक्ष शैलेश आडके यांनी केले यावेळी सागर शंभूशेटे, राम शिंदे शैलेश चौगुले सागर मादनाईक तानाजी वठारे आदी उपस्थित होते.