शर्मिला जगताप
मराठी नाट्यभाषेने मराठीला समृद्ध केले आहे. रंगभूमीवरील पात्राच्या तोंडी असलेली वाक्य थेट मराठी रसिकांच्या काळजात भिडत. अशा एका विस्मृतीत गेलेल्या नाटकातील भाषा-
वि. रं. कुलकर्णी लिखित “रक्त सांडले अधांतरी’ पेशवेकालीन नाटक होते. मराठी रंगभूमीच्या आजवरच्या इतिहासात स्टेजवर प्रथमच सादर केल्या गेलेल्या टायटल्सच्या कल्पनेचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. माइकवरून कलाकारांची ओळख करून देण्यापेक्षा हा एक अभिनव उपक्रम होता. काळ्याकुट्ट अंधारात चमकणाऱ्या कलाकारांची नावे प्रेक्षकांची लक्ष वेधत होती.
नाटकाला प्रारंभ होतो तो युनियन जॅक शनिवारवाड्यावर चढवतानाच्या दृश्याने. मराठी राज्य इंग्रजांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा श्रीमंत पेशवे यांचा उजवा हात, त्रिंबकजी डेंगळे आणि स्वतःच्या मानहानीने पेटून निघून साऱ्या मराठेशाहीवर त्याचा सूड घेणारा बाळाजीपंत नातू ही पात्रे आणि आपापसात झुंज लावून देऊन स्वतःचा स्वार्थ साधू पाहणारा एलफिन्स्टन…
“पंत शिसोद्यांच्या सिंहासनावर बसून ज्यांनी पृथ्वीचं राज्य केलं त्या राजपुतांचा हा वारसा आहे. निजामाला पुणे लुटायला लावणाऱ्या बेईमानाची ही अवलाद नाही. स्वप्नांत दिलेल्या शब्दांची इभ्रत राखण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या छत्रपतींची ही परंपरा आहे. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी इमान गहाण टाकणाऱ्या बाळाजीपंत नातूचा हा वारसा नाही’- त्रिंबकजी डेंगळे
“ती पहा… ही पहा… मी आले आहे तुमच्या सोबतीला… चुडा भरल्या हातानं आणि चालत आली आहे ती वीर पत्नीच्या पायानं… आणि काळीज घेऊन आली आहे बापाच्या रक्ताचं भिजलेलं, न्हाऊन आली आहे ती वाघिणीच्या रक्तानं’-चंद्रा “आमचा पराभव झाला तो मुत्सद्देगिरीत रणांगणांत नव्हे. आम्ही अपयशी ठरलो ते माणसाची पारख करण्यात… रणांगणांत नव्हे.’- श्रीमंत पेशवे यासारखी अंतःकरणाला भेदून जाणारी रंगभूमीवरील वाक्ये आपले धैर्य, शौर्य आणि मराठी अभिमान जागृत करतात.