सातारा – मांघर (ता. महाबळेश्वर) या गावाला “मधाचे गाव’ ही नवीन ओळख मिळवून देण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. यानिमित्ताने सातारा वन विभाग व जिल्हा प्रशासन, खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या गावात आयोजित विशेष बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची उपस्थिती होती.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे “पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. त्याच धर्तीवर मांघर गाव आता मधाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. ही ओळख मिळवून देण्याकरिता शासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी या गावाला भेट देऊन येथील मधुमक्षिका पालन व मध गोळा करणे या पारंपारिक व्यवसायाची माहिती घेतली.
यावेळी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अधिकारी डी. आर. पाटील व मधुसागर संस्थेचे चेअरमन संजय गायकवाड, पाखरे यावेळी उपस्थित होते. निसर्गाच्या मूळ संरचनेला कोणताही धक्का न लावता परंपरागत व्यवसाय करण्याच्या संस्कृतीमधूनच पारंपारिक व्यवसायाचे मार्ग वृद्धिंगत झाले. यामध्ये निसर्ग हानी फार कमी होत होती. अशाच व्यवसायांना आर्थिक बळ देण्याच्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर
निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. या उपक्रमासाठी पायाभूत सुविधा आणि योग्य बाजारपेठ निश्चितच मिळेल आणि त्यातून मांघरला नवीन ओळख मिळेल, असा विश्वास वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी व महाबळेश्वर तहसीलदार सुषमा चौधरी यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील मधुमक्षिका पालन आणि त्यांच्या उपक्रमांना भेटी दिल्या. गावातील मधुमक्षिका पालक राजेंद्र चोरगे यांच्या पालन केंद्राला त्यांनी भेट दिली. साधारण सरासरी महिन्याला किती टन मध गोळा होतो याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. येथील पारंपरिक व्यवसायाला देशपातळीवर नाव मिळून देण्यासाठी आधी पायाभूत सुविधांचे विकास, सण आणि नंतर भौगोलिक मानांकन या प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्याचे नियोजन करू, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
मानांकनासाठी प्रयत्न : संजय गायकवाड
मांघरच्या पारंपरिक स्वरूपामधील व्यवसायाची महाबळेश्वर तालुक्यामध्ये एक वेगळी ओळख आहे. महाबळेश्वर बाजारपेठांमध्ये दिसणारा मध तेथील स्थानिक मधुमक्षिका पालकांचा असतो. मांघर गावामध्ये घरटी हा व्यवसाय चालतो. या मधाची शुद्धता आणि दर्जा अव्वल असून वाई, जावळी व महाबळेश्वर या तीन तालुक्यांतून 50 टन मध उपलब्ध होतो. त्यातील पंचवीस टक्के मधपुरवठा मांघर गाव करते. त्यामुळे मधुसागर मध उत्पादक सेवा सहकार सोसायटीचे तब्बल 1600 सभासद असून मांघरला “मधाचे गाव’ हे वेगळे मानांकन मिळवण्याचे आमचे विशेष प्रयत्न असल्याचे सोसायटीचे चेअरमन संजय गायकवाड यांनी सांगितले.