नवी दिल्ली : उत्तम वक्त्या, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्ती अशा देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्रीच्या सुमारास त्यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, मध्यरात्री त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानीच अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 3 वाजता लोदी रोड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.