मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यपालांसोबत डिनर डिप्लोमसी झाली आहे त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करुन चालणार नाही. येत्या ११ ते १३ मे या कालावधीत महाराष्ट्रात काय घडेल ते सांगता येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसेल अशा घटना घडू शकतात असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या प्रचार रॅलीत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येईन म्हटलं की पुन्हा येत असतो. तुम्हाला माहित आहे मी कसा येतो. याच वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत आहेत, त्यासाठी आटापिटा करत आहेत पण फडणवीसांच्या उठाठेवींमुळे पक्षाची इमेज खराब झाली आहे असा टोला देखील सुषमा अंधारेंनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस एकदा विरोधी पक्षनेते म्हणून आले आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दिल्लीश्वरांचा गट इथे सक्रिय आहे. त्यामुळे फडणवीस पुन्हा येतील पण विरोधी पक्षाचे नेते म्हणून असे देखील यावेळी त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांचा देखील समाचार घेतला. नितेश राणेंविषयी काहीही बोलावसं वाटत नाही. राणेंना गांभीर्यानं कसं घ्यायचं? त्यांना बारसूत हिंग लावूनही लोकांनी विचारलं नाही, असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला.
रायगड, कोकण हा शिवसेनेचा गड आहे. रायगडने ठाकरे आणि शिवसेनेला भरभरून दिलं आहे. बऱ्याचशा समीकरणांची उकल होणार आहे. स्नेहल जगतापच्या पाठीशी उद्धव ठाकरेंची ताकद उभी आहे. कुणाला दाखवायची म्हणून आमची सभा नाही. बारसू आंदोलकांसाठीची ही सभा आहे, असे देखील त्या म्हणाल्या.