मुंबई – ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चार महिलांचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते, असे दाखवण्यात आले आहे. यावरून
अनेकांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाला काही जण विरोध करत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटाला काही प्रेक्षकांना मोठा प्रतिसाद दिला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील या चित्रपटावर भाष्य करत चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे.
शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ शेअर करत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, ““काल रात्री मी केरला स्टोरी पाहिला. चित्रपट पाहून मला रात्रभर झोप लागली नाही. चित्रपटातील काही सीन्स सतत डोळ्यासमोर येत होते. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की, प्रत्येकाने हा चित्रपट पाहायलाच हवा. निर्माते आणि दिग्दर्शक यांनी खूप मोठं धैर्य दाखवलं आहे. चित्रपट पाहून बरेच प्रश्न मनात उद्भवतात. ब्रेनवॉश करण्यात हे जिहादी यशस्वी होतात कारण आपण आपल्या संस्कृतीबद्दल काही माहित नसते. आपल्या याच अज्ञानाचा फायदा हे जिहादी घेतात. हेच सगळं या चित्रपटात दाखवलं आहे. यासाठीच हिंदुस्तानातील प्रत्येकाने, मुलांनी-मुलींनी हा चित्रपट बघितला पाहिजे.”
पुढे ते म्हणाले, “बरीच लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत. मी हात जोडून सगळ्या पालकांना, स्त्रियांना विनंती करतो की एकदातरी केरला स्टोरी जाऊन बघा. जिहादच्या नावावर जे काही चालू आहे यापासून सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. जोपर्यंत या देशात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंत या देशात सेक्युलरिजम टिकून राहील. ज्यादिवशी हिंदू अल्पसंख्यांक होईल तेव्हा या देशाचं इस्लामीकरण करण्यात येईल याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. आपल्या हिंदूच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केल्याबद्दल विपुल शहा आणि दिग्दर्शक यांचे आभार मानतो.”
View this post on Instagram
“मी पुन्हा हात जोडून विनंती करतो देशातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहायला हवा. तुम्ही जागे व्हा, ह्या सुंदर हिंदू धर्माला वाचवा. वसुधैव कुटुंबकमची भावना ही फक्त आपल्या रक्तात आहे. लवकरात लवकर हा चित्रपट पाहा. हा चित्रपट पाहणं आणि याला पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे,” असे शरद पोंक्षे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. दरम्यान, सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 7.5 कोटींची कमाई केली आहे.