– नितीन कुलकर्णी
जिम लेकर आणि अनिल कुंबळेंनंतर एजाज पटेलने कसोटी सामन्यात एका डावात दहाच्या दहा बळी घेण्याचा विक्रम केला आणि तिसरा खेळाडू होण्याचा बहुमान मिळवला.
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे 1992 मध्ये विश्वचषक आयोजित केला होता. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा तत्कालीन कर्णधार मार्टिन क्रो याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत अनोखा प्रयोग केला आणि तो म्हणजे गोलंदाजीची सुरुवात फिरकीपटूच्या हाती चेंडू देऊन केली. तेव्हा फिरकीपटू होता भारतीय वंशाचा दीपक पटेल. याच दीपक पटेलने आता आणखी एक भारतीय वंशाच्या खेळाडूला फिरकीपटू म्हणून समोर आणले आहे. एजाज पटेल असे नाव असून तो न्यूझीलंडच्या संघात आहे.
एजाजने ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी अलीकडेच मुंबई कसोटीत भारताविरोधात खेळताना केली. दीपक पटेल असो किंवा एजाज पटेल असो, या भारतीय वंशांच्या खेळाडूंचा डंका केवळ कॉर्पोरेट बोर्डरूम्समध्ये नाही तर खेळाच्या मैदानावर, विशेषत: क्रिकेटमध्ये वाजत आहे. भारतीय वंशाच्या खेळाडूंची यादी यांच्यावरच थांबत नाही तर ती बरीच मोठी आहे. भारतीय वंशाचे खेळाडू अन्य देशांचेही प्रतिनिधित्व करत असून ते छाप पाडत आहेत.
अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार सौरभ नेत्रवालकर हा भारतीय वंशाचा आहे. आयर्लंड, ओमान, स्कॉटलंड आदी देशांच्या संघात भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेशिवाय अन्य देशाच्या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा लीग सामने खेळणाऱ्या भारतीय उपखंडातील खेळाडूंची संख्या लक्षणीय आहे.
काही दिवसांपूर्वी इम्रान ताहिर हा दक्षिण आफ्रिकेच्या संघात प्रमुख फिरकीपटू होता. आता केशव महाराज आणि तरबेज शम्सी यांनी त्याची जागा सांभाळली आहे. याप्रमाणे ईश सोधी आणि एजाज पटेल हे न्यूझीलंडचे प्रमुख फिरकीपटू. सर्व फिरकीपटू हे दीपक पटेल, जितेन पटेल (न्यूझीलंड), मॉंटी पनेसर (इंग्लंड) यांच्यासह अनेकांनी सुरू केलेली परंपरा पुढे नेत आहेत. मॉंटी पनेसरने 2012 च्या मुंबई कसोटीत 11 बळी टिपले होते आणि ग्रीन स्वानच्या जोडीने त्यांनी वानखेडेच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले.
ऑस्ट्रेलियाकडून अजूनही शेन वॉर्नचा शोध सुरू आहे; परंतु कदाचित लेगस्पिनर फवाद अहमदला एकदिवसीय आणि टी-20 च्या संघात सामील केले असून तो वॉर्नची कसर भरून काढेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. अहमद हा पाकिस्तानचा स्टार लेगस्पिनर यासीर शाहचा नातेवाईक आहे. यापूर्वी 2017 रोजी मॉंटी पनेसरला सामील करून घेतले होते. या आधारावर तो फिरकीपटू स्टीव्ह ओकिफ आणि नाथन लयोनची मदत करेल. चार सामन्याच्या मालिकेतील निकाल हे ऑस्ट्रेलियासाठी चांगलेच राहिले आहेत.
आपला मूळ देश सोडून अन्य देशात स्थायिक होताना आपल्या फिरकीची छाप पाडणाऱ्या प्रत्येक खेळाडूची कहाणी वेगळी असते. इम्रान ताहिरचा विचार केल्यास त्याचा लाहोरचा जन्म, तो तेथेच लहानाचा मोठा झाला. पाकिस्तानच्या अंडर-19 संघाबरोबर तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला. तेथे सुमय्या दिलदारवर त्याचे प्रेम जडले. तिच्याशी 2006 मध्ये विवाह केला आणि दक्षिण आफ्रिकेचे नागरिकत्व स्वीकारले. 2011 पासून तो नव्या देशाबरोबर खेळत असून आता पुन्हा आयपीएलमध्ये सीएसकेचा प्रमुख खेळाडू म्हणून समोर आला.
केशव महाराजने 36 कसोटीत 129 बळी घेतले आहेत. पांढऱ्या चेंडूने खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे कर्णधारपदही भूषविले आहे. त्याचे पूर्वज उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर येथे राहणारे होते. मोईन अली आणि आदिल रशिद (लेगस्पिनर) हे ब्रिटनमध्ये क्रिकेटचे वेड असलेल्या पालकांचे मुले आहेत. सांगायचे तात्पर्य एवढेच की भारतीय उपखंडातील फिरकी गोलंदाजांची दखल ही संपूर्ण जगातील क्रिकेट संघाकडून घेतली जाते.
भारतीय उपखंडातील खेळाडू जेव्हा अन्य देशांसाठी खेळतात तेव्हा ते फिरकीचा सहारा का घेतात, असा प्रश्न निर्माण होतो. ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंचं सल्लागार म्हणून काम करणारे श्रीलंकेचे स्टार फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या मते, भारतीय उपखंडातील खेळाडूंमध्ये मनगटाची ठेवण आणि चेंडू फिरवण्याची नैसर्गिक क्षमता असते. मुथय्या म्हणतात की, आपल्यावर लहानपणापासून फिरकीपटूंचा प्रभाव राहिला आणि ते आपल्यासाठी नायक होते. त्यांच्याप्रमाणेच फिरकी गोलंदाजी करण्याची सवय लागली.
परदेशात स्थायिक झालेले मूळ भारतीय किंवा अन्य देशांतील खेळाडूंनी त्यांच्या लहानपणी तत्कालीन फिरकीपटूंच्या गोष्टी ऐकल्या असतील आणि त्यातूनच त्यांना फिरकीपटू होण्याची प्रेरणा मिळाली असेल, असे मुथय्या सांगतात.