Supriya Sule : देशातील अनेक बँकांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करून अनेक उद्योगपती परदेशात पळून गेले आहेत. त्यातच आता गुजरातच्या सुरतमधील बँक ऑफ बडोदामध्ये उद्योगपती विजय शाहनी १०० कोटींचे कर्ज घेऊन पत्नीसह परदेशात पलायन केले आहे. त्यात त्यांचा आणखी एक साथीदार असल्याचे समोर आले आहे.सतीश अग्रवाल असे त्यांचे नाव असून सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता याच मुद्द्यावरून राज्यात राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच प्रकरणावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ‘ट्विटरवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी “बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पळून गेलेल्या एकाही व्यक्तीला हे सरकार परत आणून वसुली करु शकले नाही. आता गुजरातमधील विजय शाह आणि आणखी एका भामट्याने सुरत येथील बँकेचे शंभर कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पलायन केले. ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकारच्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यांसारख्या आर्थिक गुन्हेविषयक अतिसक्रीय संस्थांच्या नाकावर टिच्चून हे बँकबुडवे पळून गेले आणि या संस्थांना यांची काहीच खबर लागली नाही, हे निश्चितच पटण्यासारखे नाही.” असे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पुढे त्या लिहितात, “केंद्र सरकारने या संस्था केवळ विरोधकांवर छापे टाकून त्यांना बदनाम करण्यासाठी पाळल्या आहेत का? कोट्यवधी रुपयांचे बोगस व्यवहार होत असताना याची शासनाच्या एकाही यंत्रणेला खबरही लागत नाही, हे पटण्यासारखे नाही. बँकांचा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. शासनाने तातडीने या व्यक्तींना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, या अगोदर गुजरातचा हिरे व्यापारी नीरव मोदी देखील देशातील बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झाला आहे. त्यासोबत मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या या सारख्या व्यापाऱ्यांनीही बँकांना लुबाडून परदेशात स्थायिक झाले आहेत. याच मुद्द्यावरून विरोधक वेळोवेळी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असते.