नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पती-पत्नीच्या नात्यातील संबंध सुधारत नसतील तर, तर त्यासाठी सहा महिनेथांबण्याची काही गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पूर्वी घटस्फोट घेण्यासाठी सहा महिने थांबावं लागत होतं. मात्र या निर्णयाने आता दाम्पत्याला सहा महिने थांबावं लागणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे. नाते सुधारत नसतील तर संविधानाच्या अनुच्छेद १४२ च्या तरतुदींचा वापर करून यापुढे घटस्फोट घेता येणार आहे. त्यामुळे दाम्पत्याला सहा महिने थांबण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातल्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
सध्याच्या कायद्यानुसार, पती – पत्नीला घटस्फोट घ्यायचा असल्यास कौटुंबिक न्यायालयात जावे लागते. या न्यायालयाकडून त्यांना विचार करण्यासाठी आणि एकमेकांमधले नाते सुधारण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला जातो. त्यामुळे घटस्फोट लगेच मिळत नाही, त्यासाठी हा वेळ जावा लागतो. यामध्ये अनेकदा काही जोडप्यांचा घटस्फोट घेण्याचा विचार बदलतो.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर दाम्पत्याला लवकर घटस्फोट घेता येणार आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय़ दिला आहे. नात्यात कधीही सुधारणा होऊ शकत नसेल तर घटस्फोट देणं, न्यायालयाला शक्य आहे, असे या खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये घटस्फोटाप्रकरणी याचिका दाखल कऱण्यात आली होती. कौटुंबिक न्यायालयाकडे प्रकरण न पाठवता १४२ व्या अनुच्छेदानुसार, सर्वोच्च न्यायालय घटस्फोट देऊ शकतं का, असं या याचिकेत विचारण्यात आलं होतं. त्यावर हा निर्णय देण्यात आला आहे.