वॉशिंग्टन – भारत सरकारने जो नागरिकत्व सुधारणा कायदा केला आहे तो पुर्णपणे मानवतावादी असून त्याद्वारे भारत सरकारने बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्य नागरीकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या देशातून जे बिगर मुस्लिम नागरीक भारतात पळून आले आहेत त्यांनी आपला भारतातील नागरिकत्वाच्या हक्काचा दावा केलेला नाही त्यांना या कायद्यान आता नागरिकत्वाचा हक्क मिळणार आहे त्यामुळे हा कायदा योग्य आहे असा दावा अमेरिका, कॅनडा आणि फ्रांसमध्ये वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी अल्पसंख्याकांच्या संघटनांनी आणि काही प्रमुख व्यक्तींनी केला आहे.
या कायद्याला पुर्ण पाठिंबा दर्शवणाऱ्या संघटनांमध्ये बांगलादेश मायनॉरिटी कोऍलिशन (अमेरिका), बांगलादेश मायनॉरिटी राईट अलायन्स (कॅनडा), बांगला मायनॉरिटी कौन्सिल (स्वीत्झर्लंड), बांगलादेश हिंदु कोऍलिशन (अमेरिका), आणि बांगलादेश हिंदु, ख्रिश्चन बौद्ध युनिटी कौन्सिल (फ्रांस) यांचा समावेश आहे. त्यांनी म्हटले आहे की भारत सरकार बांगलादेशातील बिगर मुस्लिमांच्या कल्याणासाठी कार्यरत राहील असा आम्हाला विश्वास आहे. हा मानवतावादी कायदा असून त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशातून निर्वासित झालेल्यां हिंदुंना जगाच्या विविध भागात आश्रय घ्यावा लागला आहे. त्यांना भारतात आश्रय मिळायला हवा असेही त्यांनी म्हटले आहे.