भोर -भोरमध्ये पुन्हा सात दिवसांचे लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून वेळेत आणि पुरेसे धान्य देण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने या भागातील दुकानदारांनी मोबाइल व्हॅनद्वारे नागरिकांपर्यंत धान्य पोहोचवण्याची शक्कल काढली आहे.
भोर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रेशनिंग कार्डधारक नागरिकांना वेळेवर धान्य देण्याची स्वस्त धान्य दुकानदारांना तहसीलदार अजित पाटील यांनी आदेश दिले आहेत. ऑगस्टचा धान्यपुरवठा योग्य पद्धतीने केला असून, आता सप्टेंबर महिन्याचे धान्यवाटप सुरू केले आहे. प्रत्येक कार्डधारकाला प्रतिमाणसी 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ आणि 1 किलो तूरडाळ देण्यात येत आहे. अंत्योदय कार्ड योजनेनुसारही धान्यपुरवठा होत आहे.
धान्य दुकानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी येथील अतिदुर्गम भागातील स्वस्त धान्य दुकानदारांनी एक उपक्रम सुरू केला आहे. मोबाइल व्हॅनद्वारे नागरिकांना धान्य पुरवठा करण्यात येत आहे. उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
मोबाइल व्हॅनद्वारे नागरिकांना धान्य पुरवठा होत असल्याने नागरिकांना वेळेत धान्य मिळत आहे. याबरोबरच करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालनही होत आहे. अतिदुर्गम भागात हा उपक्रम सुरू केला असल्याने आपत्तीच्या वेळी नागरिकांना धान्यपरवठा सुरक्षितपणे होत असल्याने नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
– अजित पाटील, तहसीलदार, भोर