नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज चालू आर्थिक वर्षातील खर्चासाठी 3 लाख 73 हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यातील 58 हजार 430 कोटी खतांच्या सबसीडीसाठी, 53 हजार 123 कोटी निर्यात अनुदानासाठी, 22 हजार 39 कोटी मनरेगासाठी खर्च केले जाणार आहेत.
अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या मागण्या सादर केल्या. एअर इंडिया ऍसेट होल्डींग कंपनीसाठी 62 हजार 57 कोटी रूपये दिले जाणार आहेत. 49 हजार 805 कोटी रूपये अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाला दिले जाणार आहेत.
संरक्षण मंत्रालयाला 5 हजार कोटी रूपये आणि गृहविभागाला 4 हजार कोटी रूपये दिले जाणार आहेत. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी मांडलेल्या या दुसऱ्या पुरवणी मागण्या होत्या.
गेल्या ऑगस्ट महिन्यात 23 हजार 675 कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या होत्या. या दोन्ही मागण्या लक्षात घेतल्यातर सरकारचा यंदा खर्च अनुमानीत खर्चापेक्षा अधिक होणार आहे. सरकारने अर्थसंकल्प मांडताना एकूण खर्च 34 लाख 83 हजार कोटी रूपये इतका अपेक्षित धरला होता.