नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये घट होत असल्याचे दिसून आले आहे आणि या आकडेवारीत जवळपास 50 टक्क्यांची घट झाली आहे असा दावा सरकारने आज राज्यसभेत केला आहे. सन 2018 मध्ये 417 दहशतवादी घटना घडल्या होत्या त्याची संख्या 2021 मध्ये 229 झाली आहे अशी माहितीही सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तराद्वारे राज्यसभेत ही आकडेवारी सादर केली,ते म्हणाले की,दहशतवादाच्या बाबतीत भारत सरकारचे शून्य-सहिष्णुतेचे धोरण आहे त्यामुळेच दहशतवादावर नियंत्रण येऊ शकले आहे असे ते म्हणाले.
मंत्र्यांनी सांगितले की, मे 2014 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत जम्मू काश्मीरात 177 नागरिक आणि 406 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हत्या झाल्या आहेत. त्या तुलनेत 5 ऑगस्ट 2019 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 87 नागरिक आणि 99 सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सरकारने मजबूत सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे असेही त्यांनी नमूद केले.