नवी दिल्ली – लोकसभेने आज 3 लाख 73 हजार कोटी रूपयांच्या अनुदान मागण्यांच्या प्रस्तावाला अनुमती दिली आहे, या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मागण्या आहेत. लोकसभा सभागृहात विविध विषयांवरून विरोधी पक्ष सदस्यांचा गदारोळ सुरू असतानाच या मागण्यांचे प्रस्ताव आवाजी मतदानाने संमत करण्यात आले.
आज मंजुर निधीपैकी 58 हजार 430 कोटी रूपये खतांच्या अतिरीक्त सबसीडी साठी वापरले जातील. 53 हजार 123 कोटी रूपये निर्यात प्रोत्साहन निधीसाठी वापरले जातील. 22 हजार 39 कोटी रूपये ग्राम विकास मंत्रालयाला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेसाठी दिले जाणार आहेत.
या विषयावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खाद्य तेले आणि अन्य जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली आहे. देशातील कर्ज बुडवून फरारी झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी आदिंच्या मालमत्ता विकून सरकारने आत्तापर्यंत 13 हजार 109 कोटी रूपये वसुल केले आहेत अशी माहितीही अर्थमंत्र्यांनी दिली.