बंगळुरू – आज रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि मुंबई इंडियन्स हे तुल्यबल संघ येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने-सामने असणार आहेत. हा समाना सांयकाळी 7.30 वा. सुरू होणार आहे. बंगळुरूने गेल्या काही हंगामांत आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
तर दुसरीकडे गेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय लाजीरवाणी राहिली होती. कारण अंबानींच्या मुंबई संघाला 14 पैकी केवळ चार सामने जिंकता आले होते. पण या मोसमात मुंबईचा संघ पूर्वीपेक्षा सरस दिसत आहे. त्यामुळे दोन्ही संघांत तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.
बंगळुरू आणि मुंबई यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यांची एकूण आकडेवारी पाहिली, तर मुंबईचा संघ खूप पुढे आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये आरसीबीने 13 तर मुंबईने 17 सामने जिंकले आहेत.
परंतु अखेच्या 5 सामन्यांकडे पाहिल्यास बंगळुरूचे पारडे जड दिसते. कारण दोन्ही संघांतील गेल्या पाच सामन्यांत मुंबई संघाला केवळ एकच सामना जिंकता आलेला आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास ती फलंदाजांना अनुकूल आहे.