आयपीएल क्रिकेट स्पर्धा तुफान लोकप्रियता मिळवत असताना तसेच ती वाढत असताना एक प्रश्न सहज मनात येतो की यातील दुपारचे सामने वगळता संध्याकाळच्या सामन्यांच्या वेळेत बदल का केला जात नाही. हे सामने संध्याकाळी 7.30 ऐवजी 7 वाजता का सुरू केले जात नाहीत. याचा तोटा कोणालाही नसताना केवळ हट्ट म्हणून या वेळेत पहिल्या मोसमापासून कधीही बदल करण्यात आलेला नाही.
अनेक क्रिकेटपटूंनी, माध्यमांनी, स्पर्धेचे प्रक्षेपण करत असलेल्या वाहिन्यांनी तसेच प्रत्यक्ष स्पर्धेत खेळलेल्या व खेळत असलेल्या खेळाडूंनीही अनेकदा ही मागणी केली आहे. मात्र, प्रत्येक वेळी बीसीसीआयने वेळेत बदल करण्यास थेट नकारच दिलेला आहे. सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाले तर काही स्पर्धांमध्ये हे सामने मध्यरात्रीही संपले आहेत. तसेच त्याच वेळेत षटके पूर्ण झालेली नसल्याने प्रचंड दंडही काही संघांना झालेला आहे.
नियमानुसार 90 मिनिटांत 20 षटके पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यानंतर जर काही वेळ जास्त लागला तर त्या वेळेत सीमारेषेवर नव्या नियमाप्रमाणे चारच क्षेत्ररक्षक ठेवता येणार आहेत, म्हणजे हेदेखील संघांचे नुकसानच आहे. सामना अर्धा तास आधी सुरू झाला तर षटके लांबली तरीही निकाल लागण्यास मध्यरात्र होणार नाही. मात्र, ही कल्पना प्रक्षेपण करत असलेल्या वाहिन्यांना मान्य नसून त्यांचे आर्थिक नुकसान होते, तसेच त्यामुळे बीसीसीआय व आयपीएल समितीलाही नुकसान होते, असे मत बीसीसीआयने व्यक्त केले होते. त्यातही तथ्य नाही. सामने सुरू कधी करायचे हे वाहिन्या नव्हे तर बीसीसीआयने ठरवायचे आहे व तो हक्कही आहे.
करोनाच्या काळात स्पर्धा अमिरातीत खेळवली गेली होती. त्यात काही सामने तर भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 2 वाजताही संपलेले आहेत. यंदा तर वाइड व नो-बॉलसाठीही डीआरएस घेता येणार असल्याने वेळ जास्तच लागणार आहे. निदान याचा सर्वंकष विचार करून या सामन्यांच्या वेळेत बीसीसीआयने बदल करावा, हीच अपेक्षा आहे.