मुंबई: अभिनेता सुनील शेट्टी याने गुरुवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हिंदी चित्रपट उद्योगाविरुद्ध द्वेष दूर करण्यासाठी आणि सोशल मीडियावरील बॉलीवूडवर बहिष्कार टाकण्याची प्रवृत्ती मोडून काढण्यास मदत करण्याचे आवाहन केले. योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी मुंबई भेटीत सुनील शेट्टी, सुभाष घई, जॅकी श्रॉफ, राजकुमार संतोषी, मनमोहन शेट्टी आणि बोनी कपूर यांच्यासह चित्रपट जगतातील लोकांची भेट घेतली. नोएडा फिल्म सिटीमध्ये शूटिंग आणि गुंतवणुकीच्या शक्यतांवर चर्चा करणे हा या बैठकीचा अजेंडा होता. यावेळी शेट्टी यांनी चित्रपट जगतातील समस्या मांडल्या.
दरम्यान, सुनील शेट्टी यांनी योगी आदित्यनाथ यांना बॉलीवूडवरील बहिष्काराचा ट्रेंड संपवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. सुनील शेट्टी म्हणाले की, बॉलीवूडची डागाळलेली प्रतिमा सुधारता यावी यासाठी बॉयकॉटचा टॅग काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे.
सुनील शेट्टी योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधताना म्हणाले, ‘हा बॉयकॉट हॅशटॅग काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे. काही लोक बिघडले असतील, पण आपण सगळेच असे नसतो. आपल्या कथा आणि संगीत आपल्याला जगाशी जोडतात आणि म्हणूनच हा कलंक दूर करणे अत्यंत आवश्यक आहे.’
काही काळापासून बॉलिवूडबाबत सोशल मीडियावर नकारात्मकतेची लाट पाहायला मिळत आहे. गेल्या २-३ वर्षात या लाटेत न जाणो किती हिंदी चित्रपट बहिष्काराला बळी पडले . 2022 मध्ये आमिर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ ते अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’, ‘दोबारा’ आणि ‘लिगर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. लोकांमध्ये बॉलीवूड आणि हिंदी चित्रपटांबद्दल इतका राग आहे की आता चित्रपटाचे नाव ऐकताच लोक त्याविरोधात बहिष्कार टाकू लागले आहेत.
बॉयकॉट टोळीच्या निशाण्यावर ‘पठाण’
आता या बहिष्कार गँगचे टार्गेट शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा चित्रपट पठाण आहे, ज्याचे ‘बेशरम गाणे’ वादात आहे. काही संघटना ‘पठाण’मधून हे गाणे काढून टाकण्याची मागणी करत आहेत, अन्यथा चित्रपटाचे प्रदर्शन रोखू, अशी धमकी दिली जात आहे. काही लोकांचा असा दावा आहे की दीपिकाने ‘बेशरम रंग’ गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे जी हिंदू धर्माचा अपमान आहे आणि निर्मात्यांनी हे जाणूनबुजून केले आहे.
बॉलीवूडवर बहिष्काराचा ट्रेंड कधी आणि कसा सुरू झाला?
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूड चित्रपटांच्या बहिष्काराच्या ट्रेंडला वेग आला आहे. 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या रहस्यमय मृत्यूने सर्वांनाच धक्का दिला होता. अभिनेत्याच्या चाहत्यांनी या मृत्यूसाठी काही बॉलीवूड लोकांना जबाबदार धरले आणि त्यांचा राग हिंदी चित्रपटसृष्टीवरही काढला. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल आल्याने परिस्थितीने आणखीनच गंभीर वळण घेतले. त्याचा परिणाम असा झाला की, अडीच ते तीन वर्षांपासून लोक बॉलीवूडविरोधात बहिष्काराचे बॅनर घेऊन उभे आहेत. बॉयकॉटच्या या आगीत आतापर्यंत बॉलिवूडचे करोडो रुपये ‘राख’ झाले आहेत. चित्रपटावर बहिष्कार टाकला जाईल किंवा मारहाण होईल या भीतीने काही चित्रपट निर्माते आणि कलाकारांनी त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे.