दुबई – आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमात इतिहासातील सर्वात सुमार दर्जाच्या पंचगिरीचा साक्षात्कार झाला, अशा शब्दांत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात घडलेल्या एका प्रसंगावरून गावसकर यांनी पंचांना लक्ष्य केले आहे.
गावसकर यांनी टीव्ही पंचालाही फटकारले आहे. सामन्याच्या अखेरच्या षटकात चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होवर 6 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी आली. त्याने षटकातील दुसरा चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकला. खरेतर तो चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पीच झाला होता. चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्याने पंचांनी हा चेंडू नो बॉल ठरवला.
मात्र, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यावर मैदानावरील पंचांनी हा निर्णय मागे घेतला. नियमानुसार, जर चेंडू पूर्णपणे किंवा अंशतः खेळपट्टीच्या बाहेर असेल तर पंच नो-बॉल देऊ शकतो. मैदानावरील पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचाने दिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून काहींनी टीकाही केली आहे. तिसऱ्या पंचाने हा चेंडू नो-बॉलऐवजी वाइड का दिला हेच समजत नाही, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.
तिसऱ्या पंचांकडून दिले गेलेले अनेक अनाकलनीय निर्णय आम्ही पाहिले आहेत. असे काही वादग्रस्त निर्णय दिले गेल्यास विजय व पराभवाचे चित्रही बदलू शकते. अशा निर्णयांनी खेळावर परिणाम होऊ नये. त्यामुळेच हा प्रसंग घडल्यानंतरही दिल्लीने सामना जिंकला याचे समाधान वाटते. मात्र, पुढील काळात पंचांची नेमणूक करताना जास्त अनुभवाला संधी दिली गेली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.