नवी दिल्ली – कोळशाच्या पुरवठ्या अभावी देशातील अनेक वीज प्रकल्प बंद पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत विजेच्या ब्लॅक आऊटचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित राज्यांनी केंद्राला आपली चिंता कळवली आहे. कोळशाची उपलब्धता वाढवणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संबंधात पंतप्रधानांना पत्र पाठवून म्हटले आहे की, कोळशाची व्यवस्था केली नाही तर राजधानी दिल्ली येत्या दोन दिवसांत अंधरात बुडण्याची शक्यता आहे.
पंजाबातील औष्णिक वीज प्रकल्पांतून कोळशाअभावी वीज उत्पादन थंडावल्याने त्या राज्यात अनेक भागात आलटून पालटून लोडशेडींग केले जात आहे. पंजाबातील काही वीज प्रकल्पांमध्ये पाच दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे. या कोळसा टंचाईबाबत केंद्र सरकारकडून वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोळशाचे भाव वाढल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे एक कारण सरकारी सूत्रांकडून पुढे केले गेले आहे. तर केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की यंदा खूप पाऊस झाल्याने त्याचा कोळशाचे उत्पादन आणि परिवहन यावर विपरित परिणाम झाला.
येत्या तीन चार दिवसांत सारे काही ठीक होईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. छत्तीसगड सरकारने काही वेगळे अधिकारी नेमून राज्यात वीज संकट निर्माण होणार नाही याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गुजरात राज्यांतही विजेचे संकट निर्माण झाले आहे.