चीनकडून आपल्या देशात होणारी आयात कमी करणे आणि व्यापारतूट कमी करणे या दिशेने विद्यमान केंद्र सरकार सतत प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून येत नाही.
चीनकडून भारतात येणाऱ्या वस्तूंमध्ये विविध उद्योगांच्या उत्पादनासाठी कामात येणारा कच्चा माल, रसायने, औषधे, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू यांचे प्रमाण अधिक आहे. चीनकडून भारतात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये मोठा हिस्सा पशुखाद्य, खनिज इंधन, अकार्बनिक रसायन, कार्बनिक रसायन, खते, विविध रासायनिक उत्पादने, प्लॅस्टिक, कागद आणि पेपरबोर्ड, कापूस, कपडे, बूट, काच आणि काचेच्या वस्तू, लोखंड, तांबे, ऍटम रिऍक्टर, बायलर, मशिनरी आणि यांत्रिक उपकरणे, विद्युत मशिनरी आणि फर्निचर इत्यादींचा समावेश होतो. विशेष म्हणजे या वस्तूंची चीनमधून होणारी आयात वाढतच आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय सण-उत्सवांच्या काळात चीनमधून होणारी वस्तूंची आयात प्रचंड मोठी असते आणि त्यातही वाढ झाली आहे. मागील दोन-तीन महिन्यांत भारतातील सणासुदीच्या काळात बाजारात चिनी वस्तूंचाच प्रभाव दिसून आला. भलेही त्याजोडीला बाजारात स्वदेशी वस्तू दिसून आल्या असतील; मात्र, तरीही चीनच्या वस्तूंच्या स्पर्धेत स्वदेशी उत्पादने काहीसे मागेच पडलेली दिसली. त्यामुळे चीनच्या वस्तूंचे बाजारातील आव्हान कायम असल्याचे दिसून आले. रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांसाठी वापर करण्यात येणाऱ्या वस्तू शक्यतो एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांदरम्यान आयात केल्या जातात. मागील वर्षाशी तुलना करता या सणांदरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या आयातीत यावर्षी जवळपास 28 टक्के वाढ झाली आहे. व्यावसायिकांच्या मते अधिक किमतीच्या वस्तू विकत घेण्याची क्षमता असलेले मध्यमवर्गीय लोक स्वदेशी स्थानिक वस्तूंना प्राधान्य देत आहेत. मात्र, कमी उत्पन्न असलेले लोक चीनच्या स्वस्त वस्तूंनाच प्राधान्य देतात.
चिनी साहित्याच्या वाढत्या आयातीमुळे भारताला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. याचे कारण जागतिक स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपया कमालीचा घसरला आहे. त्यामुळे परकीय चलनसाठ्यात घट होत आहे. अशा वेळी वाढती आयात ही संकटात टाकणारी ठरू शकते. त्यामुळे योग्य रणनीती आखून चीनकडून होणारी आयात आणि व्यापारतुटीत काही बदल होऊ शकतील. देशात आजही औषध उद्योग, मोबाइल उद्योग, वैद्यकीय उपकरण उद्योग, वाहन उद्योगासारखे अनेक उद्योग चीनकडून केल्या जाणाऱ्या आयात मालावरच अवलंबून आहेत. चीनच्या या कच्च्या मालाला पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न मागील दोन वर्षांपासून सुरू आहेत. सरकारने “प्रोडक्शन लिंक्ड इनसेंटिव’ (पीएलआय) स्कीमनुसार चौदा उद्योगांना जवळपास दोन लाख कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला आहे. देशातील अनेक उत्पादन चीनच्या कच्च्या मालाला पर्याय म्हणून पुढे येत आहेत. याच प्रकारे वेगाने पुढे जाण्याची गरज आहे.
विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)संबंधी नवी नीती सप्टेंबर 2022 पासून अवलंबण्यात येत आहे. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही बाजारात कमी खर्चात उच्च दर्जाच्या वस्तू निर्माण करण्यात येऊन चीनवरील अवलंबित्व कमी करता येऊ शकेल. आता सेझच्या नव्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारासाठी उत्पादन करणाऱ्या उत्पादकांसाठी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सेझ अंतर्गत विनावापराच्या जमिनी आणि क्षेत्राचा वापर स्थानिक तसेच निर्यातक्षम उत्पादनासाठी केला जाणार आहे. सेझच्या पोर्टल माध्यमातून सीमाशुल्क भरण्याचीही सुविधा मिळणार आहे. तसेच उत्पादन सुरू करण्यासाठी र्सव प्रकारची मंजुरीसुद्धा दिली जाणार आहे. राज्यांनासुद्धा या प्रक्रियेत सहभागी केले जाणार आहे. भांडवलाच्या सुविधेमुळे उत्पादनाचा खर्च कमी होईल आणि भारतीय बनावटीच्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेत सहज टिकतील. रेल्वे, रस्ते, बंदर यासारख्या सुविधांच्या साखळीमुळे भारतीय उत्पादन जागतिक स्तरावर प्रभाव पाडू शकतात आणि यामुळे भारताला निर्यात आधारित अर्थव्यवस्था बनण्यास मदत हाईल.
स्थानिक बाजारात चिनी वस्तूंना टक्कर देण्यासाठी आपल्याला उद्योग-व्यापार क्षेत्रातील कमतरता भरून काढाव्या लागतील. “मेक इन इंडिया’, अभियानाची व्याप्ती वाढवून “लोकल’ उत्पादनाला “ग्लोबल’ बनवले पाहिजे. स्वदेशी वस्तूंना चिनी वस्तूंचे प्रतिस्पर्धी बनण्यासाठी सूक्ष्म आर्थिक सुधारणा लागू कराव्या लागतील. यासाठी नवनव्या कल्पना, विचार, शोध आणि आयडियाजला चालना द्यावी लागणार. चिनी वस्तूंच्या जागी स्वदेशी वस्तूंचा वापर हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र बनायला पाहिजे तरच चीनवरील आपले अवलंबित्व कमी होईल. वर्ष 2019-20 मध्ये चीन-भारत तणावाच्या काळात ज्या प्रकारे चीनची भारताप्रती आक्रमकता आणि विस्तारवादी नीती समोर आली आहे, त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांचा वापर करण्याची लाट देशभर पसरली. देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार आणि सरकारद्वारे चिनी ऍपवर निर्बंध, चिनी वस्तूंच्या आयातीवर नियंत्रण आदी बाबींमुळे सणउत्सवांदरम्यान बाजारात चिनी वस्तूंची मागणी काही प्रमाणात कमी झाली. अशा स्थितीत अशी आशा आहे की, बाजारात चीनच्या वर्चस्वाला मात देण्यासाठी पूर्ण देशात अधिक उद्योगी आणि व्यावसायिकांनी नवीन शोध, नवीन विचार आणि सृजनात्मक पद्धतीने तसेच कौशल्य प्रशिक्षण आत्मसात करून चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंना स्थानिक पर्याय उपलब्ध केले पाहिजे. देशात कुटीर आणि लघु उद्योग पुनर्जीवित होऊन देश आत्मनिर्भर बनण्याकडे वेगाने पुढे जाईल.
डॉ. जयंतीलाल भंडारी