नवी दिल्ली – होळीपूर्वी हवामानात बदल होऊ लागला आहे. देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये उष्णतेची लाट वाढत चालली आहे. येत्या काही दिवसांत देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच उंचावर असलेल्या काही डोंगराळ प्रदेशांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे.
येत्या पाच दिवसांत डोंगराळ भागात हलका पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. IMD नुसार, पुढील पाच दिवसांत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी आणि पाऊस पडू शकतो.
दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. याशिवाय राजधानीत तीन दिवस वाऱ्याचा वेग जास्त राहील. वाऱ्याचा वेग 20 ते 30 किमी प्रतितास राहील असा अंदाज आहे. त्याची दिशा उत्तर-पश्चिम असण्याची शक्यता आहे. शनिवारीही अंशतः ढगाळ वातावरण राहील.
या राज्यांतील हवामान कसे असेल
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये हवामान कोरडे राहील. मात्र, येत्या चार दिवसांत पश्चिम राजस्थानमध्ये हलका पाऊस पडू शकतो. याशिवाय उद्या (रविवारी) महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज IMDने वर्तवला आहे.
यासोबतच हवामान खात्याने दक्षिण भारतातील राज्यांबद्दल सांगितले की कर्नाटकमध्ये तापमान वाढेल. कर्नाटकात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्तर केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार आहे.