ज्या काही महान व्यक्तींशी माझा संबंध आला किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळालं अशांमध्ये सुमंत मुळगावकरांचं नाव अग्रभागी आहे. केवळ माणुसकीच नव्हे तर निसर्गाला जपणारे सुमंत मुळगावकर आजही आदर्श ठरावेत. उद्योजक म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र उभं राहतं त्याला छेद देणारं असं मुळगावकरसाहेबांचं व्यक्तिमत्त्व होतं. साधा पण टापटिपीचा स्वच्छ पांढरा पोशाख, अतिशय राजबिडं रूप आणि मृदुभाषी असे मुळगावकर आम्हाला कधी कारखानदार-साहेब असे वाटलेच नाहीत.
मुंबईत जन्मलेले आणि इंग्लंडमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेले मुळगावकर साहेब कमालीचे नम्र होते. सिमेंटच्या कारखान्यात त्यांनी प्रथम आपलं कसब उपयोगात आणलं. सिमेंट उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री आयात करण्यावर त्या वेळच्या ब्रिटिश सरकारनं निर्बंध आणल्यामुळे त्यांनी ती यंत्रं देशातच बनवून घेतली. इथंच त्यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. तंत्रज्ञानाचा देशातच विकास झाला पाहिजे या तत्त्वाचा पाठपुरावा करण्यासाठी टाटा इंजिनियरिंग अँड लोकोमोटिव्ह कं. (टेल्को-आताची टाटा मोटर्स ही कंपनी) ची सूत्रं हातात येताच प्रथम जमशेदपूर इथं आणि नंतर पुण्याच्या आणि इतर कारखान्यांमध्ये तांत्रिक प्रशिक्षण विभाग सुरू केले.
या विभागातून निर्माण झालेल्या कुशल तंत्रज्ञांना केवळ देशातील इतर कंपन्यांकडूनच नाही तर परदेशातूनही मोठी मागणी होत असते. तसंच वाहनं बनवण्यासाठी लागणाऱ्या गुंतागुंतीच्या जुळण्या (असेंब्लीज्) या देखील स्थानिक कारखान्यातच बनविण्याचा आग्रह धरल्यामुळे पुढं आपल्या देशातच आपण निर्यातयोग्य वाहनं बनवू शकलो आणि वाहन-उत्पादनामध्ये भारताचा आज जो क्रमांक वरचा दिसतो आहे तो मुळगावकरांच्या दूरदृष्टीमुळेच. म्हणजे आज मेक इन इंडियाचा बोलबाला आपल्याला ऐकू येतो आहे त्याचा पाया मुळगावकर साहेबांनीच घातला आहे. शासन आज कौशल्य विकासाबद्दल प्रयत्न करताना दिसतंय पण याचीही सुरुवात तांत्रिक प्रशिक्षण विभागाच्या निर्मितीद्वारे मुळगावकरांनीच प्रथम केली. म्हणजेच 60-70च्या दशकांतच त्यांनी देश स्वावलंबी, प्रमुख निर्यातदार होण्याची स्वप्नं पाहिली होती आणि ती वास्तवात आणण्याकरता धडाडीचे प्रयत्नही केले होते.
पण मुळगावकरांचं द्रष्टेपण इथंच थांबत नाही. त्यांच्या निसर्गप्रेमाविषयी आजही गौरवानं बोललं जातं. टेल्को कारखान्यासाठी त्यांनी पुण्यात निवडलेली जमीन इतकी ओसाड होती की एखादंच खुरटं झुडूप तिथं तेव्हा दिसत होतं-बाकी नुसते दगड-धोंडे, पण कारखान्याच्या उभारणीच्या वेळीच त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष-लागवडीचं काम हाती घेतलं. जेव्हा त्या रेताड जमिनीत झाडं तगू शकणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा स्फोटकं वापरून त्या मुरमाळ जमिनीत त्यांनी मोठे खड्डे तयार करून घेतले आणि तिथं चांगली माती आणून टाकली आणि मगच वृक्षारोपण करायला सुरुवात केली. मात्र, एवढ्यावरच न थांबता कारखान्यासमोरील जागेत याच पद्धतीनं त्यांनी हजारो झाडं लावली. त्या झाडांना मुबलक पाणी मिळावं यासाठी जलसंशोधन करून जिथं झरे आहेत तिथं त्यांनी एका सरोवराची निर्मिती केली. काही वर्षांत या टापूमध्ये अक्षरश: घनदाट जंगल उभं राहिलं.
ओसाड जमिनीचा कायापालट करून तिथं नंदनवन निर्माण करणारे मुळगावकर खरं तर आधुनिक भगीरथच म्हटले पाहिजेत. असं सांगतात की, तेव्हा त्यांचे हे उपक्रम पाहून काही उद्योजक चेष्टेनं म्हणायचे की हे साहेब इथं उद्योग सुरू करायला आलेत की माळीकाम करायला? मात्र आज या नंदनवनात सायबेरियासारख्या अतिदूरच्या प्रदेशातून पक्षी थंडीच्या मोसमात अधिवासासाठी येतात हे पाहिल्याशिवाय समजणार नाही. निसर्ग आणि उद्योग यांचा समतोल कसा राखायचा याचा वस्तुपाठच मुळगावकरांनी घालून दिला. मी जेव्हा युरोपातील-विशेषत: जर्मनीतील कारखाने शेजारच्याच हिरव्यागार प्रदेशाबरोबर गुण्यागोविंदानं नांदताना पाहिले तेव्हा माझा ऊर अभिमानानं भरून आला कारण मायदेशात हीच कहाणी मुळगावकरांनी फार पूर्वी अमलात आणलेली मी पाहिलेली आहे.
चित्रकला, छायाचित्रण अशा कलांमध्येही मुळगावकरांना खूप रस होता. याशिवाय पत्नी लीला मुळगावकर यांच्याबरोबर त्यांनी सामाजिक कार्यातही योगदान दिलं. गावं दत्तक घेणं हा आज जरी गुळगुळीत झालेला शब्दसमुच्चय असला तरी त्या काळी अशा प्रकल्पांची मुळगावकरांनी प्रथम सुरुवात केली. अनेक खेड्यांमध्ये पाण्याची सोय करणे, शाळा सुरू करणे अशा त्यांच्या कामांची जर यादी करायची झाली तर ती भली मोठी आणि लांबलचक होईल.
मी संशोधन प्रभागात काम करीत होतो त्यामुळे मला त्यांचं अनेकदा दर्शन झालं. काही वेळा कामाच्या संदर्भात त्यांच्याशी बातचीतही झाली. माझ्या कामाचं त्यांनी कौतुकही केलं. इतक्या थोर माणसाला जवळून पाहता आलं आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या याचा मला सार्थ अभिमान आहे.
श्रीनिवास शारंगपाणी