सुधाताई खूप दिवसांनी वाड्यात गेल्या होत्या. काही तरी कार्यक्रमासाठी-काही तरी कार्यक्रम म्हणजे मालतीबाई आणि गणपतराव यांच्या विवाहाला पन्नास वर्षे पूर्ण झाली, त्याचा कार्यक्रम होता. वाड्यातील लोकांनीच ठरवला होता. त्यांचा वाडा फार जुना. पेशवाईच्या काळातला आहे, असे सांगतात. वाड्यातील अनेक कुटुंबांच्या चार चार-पाच पाच पिढ्या त्याच वाड्यात गेल्या होत्या. अगदी आजही गुण्यागोविंद्याने राहतात सगळे. अगदी अलीकडच्या काळात काही कुटुंबे वाड्यातील बिऱ्हाड सोडून उपनगरात फ्लॅटवासी झाली होती, पण सर्व सुविधांनी युक्त असलेल्या अगदी पॉश फ्लॅट्समध्ये त्यांनाही मनातून वाड्याची ओढ होतीच.
बंद दाराच्या फ्लॅट संस्कृतीत राहायला गेल्यानंतर त्यांना वाड्यातील मोकळेपणाची, आपुलकीची, परस्परांबद्दल असलेल्या स्नेहाची आणि आपले जीवन अगदी यांत्रिक-साचेबद्ध होत असल्याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली होती. आपल्यातच परकेपणा डोकावू लागला होता. पण आता इलाज नव्हता. आहे त्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागत होते-लागणारच होते.
पण वाडा सोडून गेली, तरीही काही ना काही निमित्ताने ती फ्लॅट संस्कृतीत गेलेली माणसे जुन्या ओढीने वाड्यात येत होती. आपल्या जुन्या शेजाऱ्यांना-स्नेहीसोबत्यांना भेटत होती. लग्नकार्य, वाढदिवस अशा काही प्रसंगांनी ती पुन्हा वाड्यात येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत होती. वाड्यात अजूनही एकी होती. लोक परस्परांशी आपुलकीने बोलत. सुखदु:खात मदत करत. वेळप्रसंगी धावून जात. अपवादात्मक प्रसंग आणि काही प्राणी वगळता सारा वाडा एक कुटुंब असल्यासारखा राहत होता. एकमेकांची सुखदु:खे वाटून घेत होता.
आजचा कार्यक्रम तसा खासच होता. आगळावेगळा होता आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा होता. विवाहाचा सुवर्णमहोत्सव ही गोष्ट आजच्या काळात दुर्मीळच. कारणे अनेक, एक तर हल्ली विवाहच उशिरा, म्हणजे वधूने पंचविशी आणि नवरदेवाने चांगली तिशी-पस्तीशी पार केल्यानंतर होतात. त्यात ती भावनिक ओढ असण्याची शक्यता अगदी कमी. हिशोबच अधिक. एकत्र कुटुंबे नसल्याने त्यांना एक ठेवणारे, प्रसंगी रागवून जवळ आणणारे कोणी नसते. दोघेही कमावते असल्याने तुझ्यावाचून काही अडत नाही अशी भावनाही अपरिहार्यपणे डोकावतेच. त्याचबरोबर आजचे सोशल वातावरण…
पण काहीही आणि कितीही कारणे असली तरी सुखाचा संसार ही गोष्ट काहीशी दुर्मीळ झालेली आहे, निष्ठा राहिलेली नाही, त्याग करण्याची वृत्तीही कमी झालेली आहे. हे वास्तव आहे. लक्ष देऊन पाहिले तर अनेक संसार हे नाईलाजाचे एकत्र राहावे लागत असल्याने चाललेले दिसतात. त्यामुळे पन्नास वर्षांचा सुखी-समाधानी आणि तृप्त संसार ही अगदी खास नोंद घेण्यासारखीच गोष्ट. असा संसार एकाच ठिकाणी, एकाच घरात असणे ही तर त्याहूनही दुर्मीळ देवदुर्लभ गोष्ट. ती गोष्ट मालतीबाई आणि गणपतराव यांच्याबाबतीत प्रत्यक्षात आलेली होती. त्यांच्या कुटुंबियांनी आणि त्याहून जास्त उत्साहाने वाड्यातील लोकांनी ती धूमधडाक्यात साजरी करण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही आणला होता. एखादा विवाह समारंभ असावा तसा वाडा सजवला होता. सनईचे मंजूळ सूर निनादत होते. सारे कसे छान छान वाटत होते.
गणपतराव व मालतीबाईंशी आजोबा-आजी, काका-काकू, दादा-वहिनी, मामा-मामी, मामा-आत्या… अशा अनेक नात्यांनी जोडली गेलेली माणसे उत्साहाने वावरत होती. मालतीबाई आणि गणपतरावांच्या विवाहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा कार्यक्रम अगदी दृष्ट लागण्यासारखा छान झाला. आलेली सर्व मंडळी अगदी आनंदात होती आणि सुवर्णमहोत्सवी जोडी तर अगदी नखशिखांत खुशीत होती. जन्माचे सार्थक झाल्यासारखी त्यांच्या चेहऱ्यावरून तृप्ती नुसती ओसंडून वाहत होती.
या समारंभासाठीच वसुधाताई वाड्यात आल्या होत्या. पण सहकुटुंब सहपरिवार आमंत्रण असूनही कार्यक्रमाला वसुधाताई एकट्याच आल्या होत्या. घरातील बाकी कोणाला वेळ नव्हता, हे त्याचे कारण सांगितले असले तरी ते खरे नव्हते. फ्लॅटवर राहायला गेल्यापासून त्यांच्या घरात वाड्यातल्यासारखी एकी राहिली नव्हती. दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये दोन बिऱ्हाडे असल्यासारखेच वातावरण झालेले होते. त्याने वसुधाताईंचा कोंडमारा होत होता. तो सुखद समारंभ झाल्यावर फ्लॅटवर परत जाताना त्यांना वाटत होते. खरंच, वाड्यात राहिलो असतो तर माणसात राहिल्यासारखे वाटले असते. आता राहतो सिमेंटच्या भिंतींच्या सहवासात.
अश्विनी महामुनी