दंतेवाडा – केंद्रीय सुरक्षा दलाच्या 165 व्या बटालियनने छत्तीसगड पोलिसांना सोबत घेऊन 2006 पासून वाट पाहत असलेले अवघड काम सीआरपीएएफने शक्य करून दाखवले आहे. यशाच्या या उंबरठ्यावर पोहोचण्यासाठी सीआरपीएफला अनेक मोठे धोके पत्करावे लागले. नक्षलवाद्यांचे अनेक हल्ले हाणून पाडले गेले. गेल्या 17 वर्षांत नक्षलवाद्यांच्या विरोधात शेकडो लहान-मोठ्या कारवाया झाल्या. वर्ष 2006 पूर्वी नक्षलवाद्यांनी आशियातील चिंचेच्या बाजारपेठेबद्दल बोलणारा परिसर नक्षली कारवायांमुळे प्रकाशझोतात येत होता.
सीआरपीएफने पोलिसांच्या सहकार्याने आता विजापूर आणि दंतेवाडा यांना जोडणारा व्यापारी मार्ग नक्षलवाद्यांच्या ताब्यातून मुक्त केला आहे. एवढेच नाही तर अवघ्या 30 दिवसांत तेथे दोन फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस(एफओबी)ही स्थापन करण्यात आले. हे एफओबी बेद्रे आणि कुंदर येथे तयार करण्यात आले आहेत. यामुळे आशियातील सर्वात मोठी चिंच बाजारपेठ आता नवे वळण घेण्याच्या मार्गावर आहे.
सीआरपीएफ स्थानिक पोलिसांसह छत्तीसगड आणि इतर राज्यांतील नक्षलग्रस्त भागात माओवाद्यांच्या अड्ड्यांवर छापे टाकत आहेत. नक्षलवाद्यांना हुसकावून लावल्यानंतर सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांकडून तेथे फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (एफओबी) उभारले जात आहेत. हे तळ केवळ धोरणात्मक नसतील, तर आजूबाजूच्या परिसरातील माओवादी कारवाया पूर्णपणे नष्ट करण्यातही ते उपयुक्त ठरत आहेत. या शिबिरांमधून स्थानिक रहिवाशांचा आत्मविश्वासही वाढतो. दीर्घकाळ नक्षलवाद्यांचा प्रभाव सहन करणाऱ्या स्थानिक जनतेला आता विकासाची नवी पहाट पहायची आहे. सुरक्षा दलांच्या उपस्थितीमुळे बहुप्रतीक्षित विकासात्मक कामांनाही तेथे गती मिळू लागली आहे.
सीआरपीएफच्या 165 व्या बटालियनने स्थानिक पोलिसांसह ईमली बाजार मार्ग नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी रणनीती आखली. वर्ष 2006 नंतर जिल्हा मुख्यालय विजापूर आणि दंतेवाडा यांना जोडणारा जुना व्यापारी मार्ग विस्कळित झाला. त्याचा व्यापक परिणाम आशियातील सर्वात मोठ्या चिंचेच्या बाजारपेठेवर दिसून आला. आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूसह अनेक भागांतील संपर्क तुटला.
माओवाद्यांनी डावपेच म्हणून येथील रस्ते खोदले, खोल खड्डे खणले, विद्युत उपकरणे नष्ट केली. या भागातील सरकारी योजनांचा मार्ग नक्षलवाद्यांनी रोखला. कोण कोणाशी लग्न करणार अशा बाबतीतही नक्षलवाद्यांनी हस्तक्षेपाचा कळस गाठला होता. त्यांनी आपले अघोषित सरकार चालवायला सुरुवात केली.
सीआरपीएफच्या 165 व्या बटालियनसह आयजी (ऑपरेशन) छत्तीसगड, डीआयजी (ऑपरेशन) सुकमा आणि एसपी आणि एएसपी सुकमा यांनी व्यापार मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी नक्षलवाद्यांविरोधात रणनीती तयार केली. 17 वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या ताब्यात असलेला परिसर मुक्त करणे हे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान होते. सीआरपीएफने हे आव्हान स्वीकारले आणि या संपूर्ण परिसरात शांतता प्रस्थापित केली.