पारनेर – तालुक्यातील देसवडे येथील प्रेमीयुगूलाने घरच्यांकडून प्रेमाला विरोध होत असल्याने 12 दिवसांच्या कालावधीतच मुलीने शेततळ्यात, तर मुलीच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन प्रियकराने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी पारनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील मुळा नदीकडेला असलेल्या देसवडे येथे ही घटना घडली आहे. या दोघांचे गावातच प्रेमाचे सूत जुळले. मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट माहिती होताच त्यांनी तिच्याकडून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यामुळे प्रियकराचा विरह तिला सहन न झाल्याने ती घर सोडून निघून गेली. या प्रकरणी तिच्या घरच्यांनी तरुणी बेपत्ता झाल्याची फिर्याद पारनेर पोलिस ठाण्यात नोंदवली. या प्रकरणी संशय या तरुणावर असल्याने पारनेर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवले. परंतु नंतर लगेच सोडूनही देण्यात आले. दोन दिवसांनी गावातील एका शेततळ्यामध्ये मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
पारनेर पोलिसांनी पंचनामा व उत्तरीय तपासणी करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गेल्या 10 ते 12 दिवसांत मोठ्या प्रमाणावर या प्रकरणी घडामोडी घडल्या. घटनेतील तरुणाला मोठा मानसिक त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मानसिक त्रासातून की मुलीच्या विरहामुळे त्याने आत्महत्या केली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेतील तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये स्थानिक तीन नावे असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक फौजदार बी. बी. भोसले यांनी दिली.
यासंबंधी कुणी फिर्याद दिली तर या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पारनेर पोलिसांनी सांगितले आहे. देसवडे येथील 19 वर्षीय तरुणाने 28 एप्रिलला लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे ज्यांनी या प्रकरणात मृत तरुणाला त्रास दिला, त्या तिघांची नावे या चिठ्ठीत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास करणारे तपासी अधिकारी सहायक फौजदार भोसले यांनी चिठ्ठी मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे खरे तथ्य समोर येणे गरजेचे असून, पोलीस कारवाई करणार का, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.