इंधनाच्या वाढत्या दरांमुळे उपपदार्थ निर्मितीतून होऊ शकतो अधिक लाभ
– दिगंबर पडकर
माळेगाव – सौदी अरेबियाने 50 टक्के इंधन निर्मिती कमी केल्याने याचा परिणाम इंधन दरवाढीवर होणार असल्याचे सांगितले जात असताना साखर कारखान्यांकडून उत्पादित होणाऱ्या इथेनॉल निर्मितीचा प्रश्नही चर्चेला आला आहे. सध्याची साखर उद्योगातील स्थिती लक्षात घेता डिसेंबरमध्ये होणाऱ्या गळीत हंगामालाच ऊस कमी पडणार असल्याने इथेनॉल निर्मितीवर साखर कारखाने लक्ष केंद्रीत करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्याच्या पश्चिम पट्ट्यातील उसक्षेत्राला महापुराचा फटका बसला आहे तर पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस दुष्काळीस्थितीत कमी झाला आहे. यामुळे गळीत हंगामात कारखान्यांना उसाची टंचाई भासणार आहे. साखरेचे कोसळणारे भाव तसेच निर्यातीचे लवचीक धोरण याचाही फटका गेल्या काही वर्षात साखर उद्योगाला बसत आहे. अशा स्थितीत फायेदशीर ठरणाऱ्या इथेनॉल उत्पादनाकडे कारखान्यांचे दुर्लक्ष होणार आहे. गळीतालाच ऊस कमी पडणार असल्याने कारखान्यांना इथेनॉल निर्मितीचा विचार सोडावा लागणार आहे. जगातील तेल उत्पादक देशांकडून उत्पादन कमी होत असल्याने इथेनॉलची मागणी वाढू शकते, यातून साखर कारखान्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. यानुसारच कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादनाची अनपेक्षित तयारी केली जाते. कारखान्याकडून गळीत हंगामातील सरासरी गाठताना प्रतिदिन इथेनॉल उत्पादनाचेही नियोजन असते. मात्र, आता आगामी काळात गळीतालाच ऊस कमी मिळणार आहे. यामुळे इथेनॉलचे अपेक्षित उत्पादनाबाबत शंका निर्माण केली जाऊ लागली आहे. जागतिक बाजारपेठेत सध्या 45 ते 50 रूपये लिटर पर्यंत चांगल्या प्रतिच्या इथेनॉलचे दर आहे, यात मागणी अधिक वाढल्यास हा दर किमान 55 ते 60 रूपयांपर्यंतही जातो, यामुळे कारखान्यांकरिता इथनॉल निर्मीती फायद्याचे ठरते. मात्र, यावेळी गळीताचाच हंगाम चालविणे कारखान्यांकरिता मोठी कसरत ठरणार आहे.
साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या ब्राझील देशातील कारखाने पुर्णत: इथेनॉलनिर्मितीवर भर देत असतात. आपल्याकडील साखर उद्योगातील या नव्या ट्रेंडकडे आपले कारखानेही लक्ष देत आहेत. आपल्याकडील साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर देण्यास आता कोठे सुरूवात केली आहे. ब्राझीलकडून रशियासह अन्य बरेच देश कच्ची साखर विकत घेत होते. परंतु, आता रशियानेच साखर उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे सर्वाधिक इथेनॉल निर्मिती ही ब्राझीलमधील कारखाने करतात. असा प्रयत्न आपल्या कारखान्यांनीही केला तर यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव देता येईल. माळेगाव कारखान्याने 2018-19 हंगामाचा सभासदांना प्रतिटन 3400 रुपये भाव दिला आहे, असे काही उपक्रम भविष्यात राबविल्यास शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देता येईल.
– रंजन तावरे, अध्यक्ष, माळेगाव कारखाना, माळेगाव
जागतिक बाजारात दरवर्षी सरासरी 17 कोटी 71 लाख टन साखर उत्पादन होत असते. यावर्षी याचे प्रमाण काहीसे कमी राहील चीन, पाकिस्तानसह अन्य देशातही साखर उत्पादित होत असल्याने आपल्याकडील साखरेला मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. जागतिक बाजारपेठेतून साखर खरेदीकरिता पर्याय उपलब्ध झाल्याने साखरेचे दर कमी-अधिक होत असतात यावर पर्याय म्हणून इथेनॉल निर्मितीवर यापुढे अधिकाधिक भर सर्वच कारखान्यांना द्यावा लागणार आहे.
– विजय वाबळे, कार्यकारी संचालक, माळेगाव