वाल्हे – मागील काळात तुम्ही ज्यांना निवडून दिले. ते बिनकामाचे निघाले. यावेळी काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या, असे आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी केले.
पिंगोरी (ता. पुरंदर) मधील काही शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांच्या गाव भेट दौऱ्या दरम्यान राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख कार्यकर्ते रुपेश यादव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पिंगोरीतील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. राज्यात कॉंग्रेसला गळती लागल्याचे चित्र असताना पुरंदर तालुक्यात कॉंग्रेसमध्ये होत असलेले प्रवेश म्हणजे तालुक्यातील बदलाची नांदी मानली जात आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान पिंगोरील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी पिंगोरी मधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी संजय जगताप म्हणाले की, गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदारांना मंत्रीपद मिळवूनही पुरंदरचा विकास करता आला नाही. जो माणूस आपला विकास करू शकत नाही किंवा आपलं काम करू शकत नाही. त्याला ठेवण्यात काही अर्थ नाही. एक वेळ संधी द्या. तुम्हाला पुरंदरचा विकास घडून दाखवतो. सासवड, जेजुरी परिसरात ज्या प्रमाणे विकास केला तसाच विकास गावागावात केला जाईल. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील रस्ते व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास विद्यमान आमदारांना अपयश आल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांच्या समवेत तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमन, नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.