Virat Kohli – भारताकडून खेळायला मिळाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. प्रत्येक सामन्यात उतरताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखण्यावर माझा भर असतो कारण त्यामुळेच संपूर्ण लक्ष सामन्यातील परिस्थितीवर ठेवता येते व त्यानुसार खेळ करता येतो. यामुळेच मला यश मिळत आहे, अशा शब्दात भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 एकदिवसीय शतकांची बरोबरी केल्यानंतर कोहलीने विविध गोष्टींवर आपली मते मांडली आहेत. तो म्हणाला, लहानपणापासूनच सचिन माझा आयडॉल होता व कायम राहील. आकडेवारीवरून कोणी कोणापेक्षा मोठा होत नसतो.
कामगिरीत सातत्य राखण्यात यश आले व वैयक्तिक कामगिरीसह संघालाही यश मिळाले तरच त्या वैयक्तिक कामगिरीला महत्त्व राहते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात माझी शतकी खेळी साकार झाली. मात्र, संघाचाही मोठा विजय झाला याचा जास्त आनंद आहे.
विक्रम बनतात, मोडले जातात व नवे विक्रम समोर निर्माण होत असतात. त्याला जास्त महत्त्व देण्यापेक्षा आपल्या भावनांवर नियंत्रण राखत सदैव संघहित डोळ्यासमोर ठेवले तरच त्या खेळाडूच्या कारकिर्दीला महत्त्व राहते.
रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहितने जी सुरुवात करून दिली किंवा एकूणच यंदाच्या स्पर्धेत रोहित सुरुवातीच्या षटकात ज्या पद्धतीने आक्रमक फलंदाजी करत आहे. त्यामुळे नंतर फलंदाजीला येत असलेल्या फलंदाजांचे काम सोपे होत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही हेच सिद्ध झाले. खरेतर या सामन्यासाठीची खेळपट्टी फलंदाजांसाठी मदत करणारी नव्हती. खेळपट्टीवर थांबून खराब चेंडूंची वाट पाहणे गरजेचे होते व तेच मी केले.
माझे शतक संथ होते असेही काहीजण बोलत आहेत. मात्र, मी संघाची स्थिती व खेळपट्टीचा रागरंग पाहून खेळात बदल केला व सावध खेळ करत शतकी पल्ला गाठला, असेही कोहलीने सांगितले.
याच स्पर्धेत माझा विक्रम मोड – तेंडुलकर
शतक क्रमांक 40 ते 50 साकार करण्यासाठी मला तब्बल 365 दिवस लागले, पण मला आशा व विश्वास आहे, की तू येत्या काही दिवसांतच माझ्या शतकांचा विक्रम मोडशील, अशा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत.
आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू – पॉंटिंग
विराट कोहली हा आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने व्यक्त केले आहे. येत्या काळात तो असेच नवनवे विक्रम साकार करेल. त्याच्यासारखे फलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही गोलंदाजीसमोर आपले ध्येय गाठतात व हेच त्यांचे मोठेपण असते, असेही तो म्हणाला.
रोहितची आक्रमकता व कोहलीचा संयम
भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी कोहलीच्या 49 व्या शतकासाठी त्याला शुभेच्छा तर दिल्या आहेतच मात्र, त्याचबरोबर त्यांनी कर्णधार रोहित शर्माचेही कौतुक केले आहे.
भारतीय संघाला असा कर्णधार लाभला आहे जो संघहितासाठी आपली वैयक्तिक कामगिरी बाजूला ठेवत आहे. तो प्रत्येक सामन्यात आक्रमक सुरुवात करून देतो व त्यामुळे समोरच्या संघातील गोलंदाजांवर सातत्याने दडपण राहते व त्यामुळेच भारतीय संघाचे कामही सोपे होते, असेही ते म्हणाले.