मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनचे पेन ड्राईव्ह सादर करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावून घेतले होते. या बैठकीत सुषमा चव्हाण यांनी सर्व कागदपत्र सादर केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यावर विधीमंडळात सरकार कोणती भूमिका घेणार आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचे कारस्थान शिजण्याचे मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला होता. या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील विधानसभेत उद्या, गुरुवारी उत्तर देणार आहेत.
गिरीश महाजन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर पुण्याच्या एसीपी तपास अधिकारी सुषमा चव्हाण या पुण्यातून थेट मुंबईत दाखल झाल्या. यानंतर त्यांनी सकाळी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली आणि संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर सुषमा चव्हाण आणि संजय पांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी सुषमा चव्हाण यांनी आपल्यासोबत आणलेली कागदपत्र गृहमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहे.
दरम्यान, या बैठकीआधी दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. काल सभागृहात विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज उत्तर देणार होतो. त्यासाठी तयार होतो. पण त्यांनी मागणी केली होती की, उद्या चर्चा व्हावी. त्यामुळे मी उद्या उत्तर देईल. त्यांनी खरेतर कायदा सुव्यवस्था यावर बोलायचे होते. पण ते त्यांच्या कर्तव्यापासून दुर गेले आहे, उद्या माझ्या उत्तरानंतर “दुध का दुध, पानी का पानी होईल’, असे म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपला इशारा दिला.