नोएडा – शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या संघटनेचे कार्यकर्ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) पहारा देण्यासाठी सरसावले आहेत. त्यांनी ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या ठिकाणांलगत मुक्काम ठोकण्यासाठी तंबू उभारले आहेत.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (गुरूवार) जाहीर होणार आहे. त्या निकालाच्या पूर्वसंध्येला भारतीय किसान युनियनच्या (बीकेयू) कार्यकर्त्यांनी पश्चिम उत्तरप्रदेशात विविध ठिकाणी तंबू ठोकले आहेत. त्या तंबूंमध्ये राहून बीकेयूचे कार्यकर्ते ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ नये या उद्देशातून सतर्क राहणार आहेत.
बीकेयूचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या टिकैत यांनी काही दिवसांपूर्वी निकालात अनियमितता होण्याची शक्यता वर्तवली होती. ईव्हीएमची सुरक्षा करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले होते. देशाची सीमा आणि शेतीचे रक्षण करण्याबरोबरच शेतकऱ्यांनी मतांच्या सुरक्षेसाठी तयार रहावे. लबाडी करणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवता येऊ शकणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर वर्षभर चाललेल्या आंदोलनात सहभागी शेतकरी संघटनांमध्ये बीकेयूचाही समावेश होता. त्या आंदोलनावेळी टिकैत प्रसिद्धीझोतात आले.