मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा आहे. याआधी मुंबईत सभा घेत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. याबरोबरच भोंग्यांच्या मोठ्या आवाजामुळे त्रास होतो असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज यांच्या या भूमिकेवरून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दुपारपर्यंत झोपून राहतात आणि म्हणतात भोंग्याचा त्रास होतो, असा टोला देसाई यांनी लगावला आहे.
सुभाष देसाई म्हणाले, सगळेच सभा घेत असतात, पण राज ठाकरे यांची आजची सभा ही सुपारी सभा आहे. असे सुपारीबाज नेते आले आणि झोपले. दुपारी उठायचं आणि सभा घ्यायची. दुपारपर्यंत झोपून राहतात आणि म्हणतात भोंग्याचा त्रास होतो. कमळाचे आणि भुंग्याचे नात जूने आहे. मात्र, आता कमळाचं आणि भुंग्याचं हे नवीन नातं झालंय. हा भुंगा कमळाच्या पाकळ्या कुरतडेल. सरडा रंग बदलतो तसे रंग बदलताता राज ठाकरे. भगवी शाल घेऊन फोटो काढले म्हणून कोणाला शिवसेना प्रमुख होता येत नाही. त्यांच्या आवाजाची आणि शाल घेण्याची नक्कल करता येईल, पण त्यांच्या विचारांची नक्कल करता येणार नाही. सगळ्या शकुनांना ठेचून शिवसेना पुढे जाणार, असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेल्या मशिदीवरींल भोंगे उतरवण्याच्या भूमिकेसह हनुमान चालिसा पठण, कट्टर हिंदूत्व यावरून ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राज्यात सुरु आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही मनसे-भाजप युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप-मनसे युती झाली तर आगामी महापालिका, विधानसभा निवडणूकीत भाजपला याचा किती फायदा होतो व महाविकास आघाडीला किती फटका बसतो हे पाहणे महत्वाचे आहे.