वाघोली- शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची या वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करू नये, असे आदेश दिले असताना फी भरली नाही किंवा इतर काही कारणामुळे मुलांचे ऑनलाइन शिक्षण थांबवण्याचा प्रकार वाघोली (ता. हवेली) येथील श्री चैतन्य स्कूलच्या व्यवस्थापनाने केला होता. याबाबत पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप सोमनाथ सातव यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता. त्यानुसार उपशिक्षणाधिकारी यांनी शाळेची फी भरली नाही म्हणून ऑनलाइन शिक्षण बंद करू नये व यापुढील काळात शिक्षक व पालक संघटनेची कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी घेण्याचा आदेश चैतन्य स्कूल शाळा व्यवस्थापनाला दिला आहे.
शाळेची फी भरली नाही म्हणून ऑनलाइन शिक्षणासाठी लिंक न पाठवणे, ऑनलाइनसाठी आवश्यक पासवर्ड न देणे, कोणत्याही प्रकारची फीमध्ये सवलत न देणे, याबाबत पालकांच्या वतीने शिक्षण विभागाकडे स्कूलसंदर्भात अनेक तक्रारी होत्या. लॉकडाऊननंतर विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या परवानगीने ऑनलाइन शिक्षण घेण्याबाबत शिक्षण विभागाने आदेश दिले होते. त्यानुसार ऑनलाइन शिक्षण सुरू झाले होते. मात्र, श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांची फी न भरल्याच्या कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले होते. शिक्षक-पालक संघटनेने स्कूलविरोधात तक्रार केली होती. त्या अनुषंगाने प्राथमिक उपशिक्षणाधिकारी यांनी ऑनलाइन शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही. व फीबाबत शिक्षक पालक यांच्याशी समन्वय साधून योग्य ते निर्णय घेण्याबाबत आदेश दिले आहेत.
<
blockquote>वाघोली येथील श्री चैतन्य स्कूल यांनी शिक्षक पालक संघ स्थापन केला नाही. पालक संघाच्या मान्यतेने कोणतीही फी अद्याप आकारली नाही. त्यामुळे स्कूलकडून मनमानी कारभार सुरू असून याबाबत उच्च न्यायालयात पालकांच्या वतीने जनहित याचिका दाखल करणार आहोत.
संतोष साहेबराव सातव, पालक प्रतिनिधी, वाघोली.