नवी दिल्ली – हिंदी महासागर परिसरातील राष्ट्रांच्या संरक्षण मंत्र्यांची एक परिषद भारतात पुढील महिन्यात आयोजित केली जाणार आहे. हिंदी महासागरात चीनचा सध्याचा जो वाढता प्रभाव आहे त्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित करण्यात आल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
एरो इंडियाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी 4 फेब्रुवारी रोजी ही परिषद आयोजित केली आहे. हिंदी महासागर परिसरात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी नांदावी यासाठी विचारविनिमयही या परिषदेत केला जाणार आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून चीनने भारतीय हद्दीत अतिक्रमण करून जी आक्रमक भूमिका घेतली आहे त्या पार्श्वभूमीवर भारताकडून केल्या जात असलेल्या या प्रयत्नांना विशेष महत्त्व आले आहे.
चीनच्या सागर हद्दीतील आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी भारतीय नौदलानेही या समुद्रात अनेक युद्धनौका व पाणबुड्या तैनात केल्या आहेत. या संबंधात अन्य सागरी शेजारी देशांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न भारताकडून केला जात आहे त्याचेच हे द्योतक मानले जात आहे.