पिंपरी, (प्रतिनिधी) – महायुतीकडून मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरलेले शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना मित्रपक्षाच्या पदाधिकार्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. तर काही दिवस प्रचारादरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील घटक पक्षांच्या पदाधिकार्यांच्या घरी भेट देत, त्यांची मनधरणी करावी लागली.
तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते सकि्रय नसल्याच्या चर्चा सातत्याने सुरु होत्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बारणे यांनी सोमवारी (दि.15) सर्व घटक मित्र पक्षाच्या पदाधिकार्यांची भरगच्च पत्रकार परिषद घेत, या पदाधिकार्यांची भूमिका स्पष्ट करायला सांगत, महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न केला.
या पत्रकार परिषदेला आमदार अण्णा बनसोडे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, रिपब्लिकन पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर,प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अमित गोरखे, राजु दुर्गे आदी उपस्थित होते.
मावळातील जनतेचा प्रवास टोलमुक्त होणार असल्याच्या आश्वासनाबद्दल त्यांना विचारले असता, ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील टोलबाबत भूमिका घेतली होती. मात्र, ज्या टोलनाक्यांची मुदत संपलेली नाही, त्याठिकाणी टोल वसुली सुरू असल्याची बाब बारणे यांनी मान्य केली.
आता ते नात्या-गोत्याचे राजकारण मानत नाही
गेल्या लोकसभा निवडणुकीत स्थानिक, नाती-गोती आणि बाहेरील उमेदवार याची जोरदार चर्चा होती. परंतु यंदा दोन्ही उमेदवार स्थानिकच असून दोघांच्याही पाहुण्या-रावळ्यांच्या शहरात मोठा गोतावळा आहे. यावेळी श्रीरंग बारणे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघातील 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक आहेत.
देशाची निवडणूक ही कुठल्या धर्माच्या, जातीच्या, नात्याच्या आधारावर होत नाही, असे सांगत देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा तो सुरक्षित कुणाच्या हातामध्ये राहील देशाचे नेतृत्व कोण करणार आहे, या दृष्टिकोनातून मतदार ठरवतात आणि हा भावनिक खेळ चालत नाही. मतदान झाल्यानंतर चार जूनला निकाल लागल्यानंतर त्याचे चित्र स्पष्ट होईल. खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील नात्यागोत्याच्या राजकारणाची शक्यता फेटाळून लावली.
पार्थ पवारांना प्रचारासाठी बोलवू
गेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणुकीत उतरले होते. यंदा चित्र बदलेले आहे. अजित पवार यांचा पक्ष मित्र पक्ष आहे. यामुळे पार्थ पवार यांना तुमच्या प्रचाराकरिता बोलावणार का? या प्रश्नावर त्यांबारणे म्हणाले की नक्कीच पार्थ पवार यांना प्रचारासाठी बोलावणार आहे.
मात्र. बारामती लोकसभा मतदार संघामधून त्यांच्या मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या प्रचाराची जबाबदारी पार्थ यांच्यावर आहे. त्यामुळे ते याठिकाणी किती वेळ देऊ शकतात, हे सांगणे कठीण असल्याचे बारणे म्हणाले.
मनसे पदाधिकार्यांची अनुपस्थिती
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असतानादेखील या पत्रकार परिषदेला मनसे पदाधिकारी गैरहजर होते. याबाबत विचारले असता खासदार बारणे म्हणाले की, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले हे माझ्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांना पुण्यात अचानक बैठकील जावे लागल्याने मनसेचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकले नाही. मात्र. ते महायुतीसोबत असल्याचा दावा बारणे यांनी यावेळी केला.