मुंबई -देशभरात करोना लसीचा तुटवडा जाणवत असतानाच निर्बंधामध्ये वाढ होत आहे. याचा अर्थव्यवस्थेवर किती काळ परिणाम होणार आहे याचा अंदाज गुंतवणूकदारांना येणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेअर बाजारात कमालीचे अस्थिर वातावरण आहे. खरेदीबरोबर विक्रीही तेवढीच होत असल्यामुळे शेअरबाजारात खरेदी विक्रीच्या लाटा येत आहेत. शुक्रवारी बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 18 अंकांनी कमी होऊन 14,677 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 41 अंकांनी वाढून 48,732 अंकांवर बंद झाला.
एशियन पेंट्स, नेस्ले, आयटीसी, एल अँड टी, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात आज बऱ्यापैकी वाढ झाली. तर इंडसइंड बॅंक, महिंद्रा, डॉ. रेड्डीज, स्टेट बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. याबाबत कोटक महिंद्रा एएमसीच्या संशोधन प्रमुख सिबानी कुरियन यांनी सांगितले की, करोनाचे वाढणारे रुग्ण आणि आरोग्यविषयक सुविधांचा अभाव यामुळे आगामी काही काळ तरी शेअर बाजार निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
करोना रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या उत्पादकतेवर परिणाम जाणवू लागला आहे. जागतिक बाजारातून आज संमिश्र संकेत आले. सेन्सेक्स संदर्भातील 30 कंपन्यांपैकी 20 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्याचे दिसून आले. सरलेल्या आठवड्यात निफ्टी 145 अंकांनी तर सेन्सेक्स 473 अंकांनी कमी झाला आहे.
आजच्या पडत्या काळात ग्राहक वस्तू, भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. तर धातू, वाहन क्षेत्रानी सपाटून मार खाल्ला. मोठ्या कंपन्या व छोट्या कंपन्यांच्या शेअरची जास्त विक्री झाल्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप 1.18 टक्क्यांपर्यंत कोसळले. जागतिक बाजारात महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे वातावरण नकारात्मक आहे.