कोरेगाव – कोरेगाव शहरासाठी जाहीर केलेला प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी जाहीर केलेल्या बंदला कोरेगावकरांनी शंभर टक्के प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. शासनाच्या नगररचना विभागाने पुढील पंचवीस वर्षात वाढणारे नागरिकरण लोकसंख्या याचा विचार करून तयार केलेला प्रारूप विकास आराखडा गेल्या महिन्यात नगरपंचायत आणि 3 फेब्रुवारी रोजी शासनाच्या राजपत्रात जाहीर केला. या आरखड्यात रिंगरोड, डम्पिंग ग्राउंड, खेळाचे मैदान, शाळा, बगीचे, रस्ते आदीसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. आराखड्यात अनेक शेतकऱ्याच्या शेतजमिनी आरक्षित केल्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी आराखडा जाहीर झाल्यापासून विरोधाची भूमिका घेऊन आराखडा रद्द करण्यासाठी रास्तरोको, धरणे, आंदोलन केले. त्याच्याच एक भाग म्हणून सोमवारी नागरिक आणिव्यापारी यांनी स्वयंमस्फूर्तीने कोरेगाव बंद ठेवले. बंदला कोरेगावकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.
शहरातील छोट्या मोट्या व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली होती. बाजार समितीपासून कुमठे फाट्या प्रयन्तचा सातारा-पंढरपूर महामार्ग, जुना मोटार स्टॅण्ड परिसर, आझाद चौक, बाजार मैदान, व्यापार पेठ, आझाद चौक, तहसील कार्यालय, शिवाजीनगर, सुभाषनगर, परिसरात शुकशुकाट जाणवत होता. दर सोमवारी आठवडा बाजारामुळे शहर लोकांनी गजबजलेले असते. परंतु बाजार बंद राहिल्याने बाजार मैदान आणि शहरातील रस्ते ओस पडले होते. बाजार बंद राहिल्याने बाजारासाठी भाजीपाला घेऊन येणाऱ्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
काळी पिवळी टॅक्सी आणि रिक्षा सेवा बंद राहिल्याने शहरातून सातारा, पंढरपूर आणी रहिमतपूरकडे जाणाऱ्या प्रवाशी वर्गाला त्रास झाला. आझाद चौक आणि जुना मोटार स्टॅण्ड परिसरात प्रवश्याची एस.टी साठी गर्दी झाली होती. टॅक्सी सेवा बंद असल्याने एस टी बसेस प्रवाशांनी भरून वाहत होत्या. रिक्षा सेवा नसल्याने बाहेरून येणारे प्रवासी दुचाकीवरून व चालत जात होते. बाहेरून येणाऱ्या लोकांना पाणी आणी चहा देखील मिळाला नाही. शहरातील दुकाने वगळता सरकारी कार्यालये, कॉलेज, मेडिकल, दवाखाने, पेट्रोल पंप सुरु होती. बंदमुळे शहरात कोठेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सपोनि एस. आर. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.