औरंगाबाद – महामार्ग असो वा इतर कुठलाही रोड असो प्रत्येक ठिकाणी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. अपघात झाल्यास हेल्मेटमुळे आपले प्राण वाचू शकतात. त्यामुळे शासकीय कार्यालयांत विनाहेल्मेटधारक कर्मचारी, अधिकारी व नागरिकांना प्रवेश मिळणार नाही, असे आदेश परविहन आयुक्तांनी नुकतेच काढले आहेत. यावर आता औरंगाबाद शहरात अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. आरटीओ आणि पोलिसांतर्फे हेल्मेटबद्दल जनजागृती करावी, त्यानंतर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत.
आता शासकीय कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक अशा प्रत्येक दुचाकी चालकाला हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नये, हेल्मेट नसल्यास कारवाई करावी आणि जिल्हा प्रशासनातर्फे हेल्मेटचा वापर वाढण्यासाठी प्रबोधन सुरू करावे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थांनाही सहभागी करून घ्यावे आणि त्यानंतर कारवाई करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
अनेकदा चारचाकी, ट्रक किंवा इतर वाहने मनमानी करत ड्रायव्हिंग करताना दिसून येतात. त्यामुळे दुचाकी चालविताना चालकांना खूप कसरत करावी लागते. एखाद्यावेळी वाहनचाकाचे नियंत्रण सुटले की, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अपघात झाला तर, अनेक वेळा दुचाकीस्वाराचा घटनास्थळी किंवा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांना कायमचे अपगंत्वही आले आहे.
मृत्यू, अपगंत्व झाल्यास स्वतःच्या कुटुंबाचा आधारस्तंभ गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर येते. अशा वेळी मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न करणे आपल्या पश्चात कुटुंबातील इतर व्यक्तींना खूप कठीण होते. त्यामुळे तशी वेळ विनाकारण आपल्यावर किंवा आपल्या पश्चात कुटुंबातील सदस्यांवर येऊ देऊ नका. बाजारात 500 रुपये किंमतीपासून विक्रीला असलेले हेल्मेट दुचाकी चालविताना सतत वापरा आणि आपला जीव वाचवा, असे आवाहनही अनेकदा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.