पुणे – गेल्या सव्वा वर्षांहून अधिक काळ आपला देश व संपूर्ण विश्व करोना महामारीने त्रस्त आहे. पुणे शहर जिल्हाचा विचार केला तर, आपल्याकडे तीनवेळा लॉकडाऊन झाले. सुमारे सव्वा वर्षाच्या काळात पाच महिन्यांचा कालावधी या लॉकडाऊनमध्ये गेला. उर्वरीत काळातही दुकाने व व्यापार थोडाफार सुरु राहून देखील व्यवसाय झाला नाही. यामुळे व्यापार क्षेत्र सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. महाराष्ट्र व देशाला पुन्हा उभारी घ्यायची असेल तर, व्यापार क्षेत्राला ताकद देण्याची आवश्यकता आहे. राज्य व केंद्र सरकार व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्जाचे पुर्नगठन, कर्जफेडीसाठी एक वर्षानंतर हप्ता सुरू, शून्य टक्के व्याज दराने तीन वर्षांसाठी कर्ज इत्यादी माध्यमातून व्यापारी वर्गाला मदत करू शकते, असे मत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष व कैट महाराष्ट्र संघटनेचे सहसचिव सचिन निवंगुणे यांनी व्यक्त केले आहे.
व्यापारामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. साधारणपणे चारशे विविध प्रकारचा व्यापार व व्यवसाय आपल्याकडे होतो. देशाचा विचार केला तर, सुमारे १० कोटी लोकसंख्या व्यापार करते. आणि या क्षेत्रातील रोजगार पकडता सुमारे ४० कोटी लोकसंख्या एकट्या व्यापार क्षेत्रावर अवलंबून आहे.
पुण्यात सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख आहे. त्यावर अवलंबून असलेल्या संख्या २० ते २२ लाख आहे. त्यामुळे करोना व लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ झटकून आर्थिक प्रगतीला चालना द्यायची असेल तर, व्यापार क्षेत्राला मदत देण्याची, ताकद देण्याची नित्तांत आवश्यकता आहे. याचं कारण म्हणजे लॉकडाऊन काळात व्यवसाय ठप्प राहिला तरी, जागा भाडे चुकले नाही. शिवाय व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचा हप्ता चुकला नाही. वीज बिल भरावेच लागले. कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा लागला. प्राॅपर्टी टॅक्स भरावा लागला. वेळे अभावी डेड स्टाॅक काढून टाकावा लागला. घरातील इतर खर्च सुरू होता. असे असताना करोना आल्यापासूनच्या सव्वा वर्षाच्या काळात व्यापाऱ्यांचे उत्पन्न शून्य राहिले आणि खर्च मात्र सुरु राहिला. यामुळे व्यापारी वर्ग मोठ्या आर्थिक संकटाला सामोरा जात आहे, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.
पहिल्या लॉकडाऊनच्या काळात हा लॉकडाऊन किती वाढेल याची कल्पना नसल्याने व्यापारी वर्गाने नडलेल्या लोकांना मदत करताना हात अकडता घेतला नाही. त्यांना भरभरून सढळ हाताने मदत केली. मात्र करोनाचा काळ वाढला. दुसरी लाट आली. पुन्हा लॉकडाऊन झाला. यामुळे जवळचे पैसे नडलेल्यांच्या मदतीत खर्च करून बसलेला व्यापारी आज मात्र संकटात सापडला आहे. लोकांच्या दृष्टीकोनातून व्यापाऱ्यांकडे खूप पैसा असल्याचे वाटते. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. कर्ज काढून सोने मोडून व्यवसायात आलेला व्यापारी या करोनाने हतबल झाला आहे. यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकारकडून व्यापाऱ्यांना मदत होणे ही काळाची गरज आहे, असेही म्हटले आहे.