फुरसुंगी -भेकराईनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची भागांतील नैसर्गिक ओढे-नाल्यांचे पात्रच हरवले आहे. राडारोडा, झाडीझुडपे, कचरा तसेच अतिक्रमण यामुळे ओढ्यांचे पात्र काही ठिकाणी अरूंद तर काही ठिकाणी वळवण्यात आले आहे. त्यातच या गावांची स्वतंत्र नगरपरिषद होणार असल्याच्या कारणातून या भागांतील ओढे-नाल्यांची सफाई करण्याकडे पुणे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात पूर सदृश्यस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. महापालिका प्रशासनाने तांत्रिक बाजूवर बोट न ठेवता फुरसुंगी तसेच उरूळीदेवाची भागातील ओढ्या-नाल्यांच्या सफाईची कामे करावीत, अशी मागणी करताना समाविष्ठ 11 गावांचे माजी नगरसेवक गणेश ढोरे यांनी सांगितले की, फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन्ही गावे पुणे महापालिकेतून वगळून या गावांची स्वतंत्र नगर परीषद करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर नगर परीषद कार्यान्वित होण्यापूर्वीच पुणे महापालिका आयुक्तांनी तोंडी आदेश देत या भागातील बहुतांश विकासकामे व दुरुस्ती कामे बंद केली आहेत. यातून सामान्य नागरिकांची मोठी फरफट होत आहे. महापालिकाही नाही आणि नगरपरीषदही नाही, अशी अवस्था झाल्याने या भागाला कोणी प्रशासकीय वालीच उरला नाही का? असा सवालही ढोरे यांनी केला आहे.
1
भेकराईनगर, मंतरवाडी, उरुळीदेवाची, गंगानगर, कचरा डेपो आदी भागातील नाले व ओढ्यांची साफसफाई झालेली नाही. ओढ्यांतच मोठ मोठी झाले उगवली आहेत. तसेच, ओढ्याच्या पात्रात मोठे दगड, रोडारोडा टाकण्यात आल्याने या भागात पावसाचे पाणी रस्ते व घरांमध्ये शिरण्याचा धोका आहे. येथे मोठी पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.
सासवड मार्ग, बाह्यवळण मार्ग व फुरसुंगी गावात जाणाऱ्या रस्त्यावर व्हेबगीर शाळेजवळ ओढ्यावरील कलर्व्हटरचे काम झाले नसल्याने पावसाळ्यात 5 ते 6 फुटांपेक्षा जास्त उंचीचे पाणी येथून मोठ्या वेगाने पाणी वाहते, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. एखादे वाहन वाहून जावून जीवितहानी होण्याचा धोका आहे.
पालिका प्रशासनाने तत्काळ या भागातील ओढे व नाल्यांची साफसफाई करुन पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, येथील ओढे-नाले सफाईची कामे फारच जुजबी झाली असून या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झुडपे व गाळ,कचरा साचल्याने पाणी जाण्यास जागाच शिल्लक राहीली नाही.