सातारा – जिल्हा परिषदेतील सर्व विभागात ई- ऑफिस प्रणाली सुरु होणार असून या प्रणालीमुळे सर्व विभाग पेपरलेस होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते. ई- ऑफिस प्रणालीचा अवलंब करणारी सातारा जिल्हा परिषद पुणे विभागात पहिली ठरणार असून लवकरच ही प्रणाली अंमलात येण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
प्रशासकीय कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत ऑफलाइन काम असल्याने अनेक कामांमध्ये विलंब लागत आहे. फाइल्स पेंडींग असताना कोणत्या टेबलला फाइल्स आहेत याचीही माहिती तात्काळ उपलब्ध होत नाही. सार्वजनिक तक्रारी निवारणासाठी ऑनलाइन यंत्रणा नसल्याने नागरिकांचीही अडचण होत आहे. ई- प्रणालीमुळे या तक्रारींचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य होणार आहे. कुठली फाइल कोणत्या विभागात आहे याची ऑनलाइन माहिती मिळणार आहे. त्यामुळे ई- प्रणालीचा वापर सुरु झाल्यानंतर नागरिकांच्या कामाला गती मिळणार असून प्रशासनातही सुसूत्रता येणार आहे. ई- प्रणाली सुरु झाल्यानंतर कागदपत्रांमध्ये डिजिटल सहीचाही वापर केला जाणार आहे. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये “ई- ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यानंतर कामकाजाला गती येईल, सर्व कार्यालये “ई- ऑफिस’ वापरू लागले की मोबाइलवर देखील कामकाजाच्या फाइल्स, कागदपत्रे पाहता येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने पहिल्या टप्यात ई- ऑफिससाठी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण झाले आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेत ई- प्रणाली सुरु झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचेही हेलपाटे कमी होणार असून प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज करणे सोयीचे जाणार आहे.
जिल्हा परिषदेत झालेल्या ई- ऑफीस कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे सर्व विभागाचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पुणे येथील भूमीअभिलेखचे उपअधीक्षक अमोल भोसले, भूमीअभिलेख जिल्हा अधीक्षक श्रीकांत वाघाडे यांनी याबाबत प्रशिक्षण दिले. या प्रणालीची लवकरात लवकरात जिल्हा परिषदेत अंमलबजावणी करण्याबाबत ज्ञानेश्वर खिलारी यांनी सर्व विभागप्रमुखांना सूचना दिल्या असून विभागनिहाय नियोजन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात ई ऑफिस प्रणालीची जिल्हा परिषदेत अंमलबजावणी होणार हे आता निश्चित झाले आहे.
सध्या सर्व कामकाज ऑफलाइन असल्याने अनेक विभागांतून विविध कामांच्या फाइल्स पुढे नेण्यासाठी विलंब लागतो. ई- प्रणालीचा वापर सुरु झाल्यानंतर फाइल्सचा प्रवास कमी होऊन सर्व कामकाज ऑनलाइन दिसणार आहे. एखाद्या फाइलबाबतच्या माहितीमध्ये पारदर्शकताही येणार आहे. या प्रणालीमुळे कामकाजात गतीमानता येणार असून जिल्हा परिषद संगणकीकृत होणार आहे. खातेप्रमुखांना त्यांच्या कार्यालयाकडील टपालांची अद्ययावत माहिती प्राप्त करणे सुलभ ठरणार आहे.
ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी