नवी दिल्ली :- आपले वाढलेले वजन कमी करण्याच्या किरकोळ उद्देशाने खेळाचा पर्याय निवडलेल्या, हरियाणाच्या एका लहानशा गावातल्या युवा नीरज चोप्राचा स्टार प्लेअर म्हणून झालेला उदय हा सारा एक संस्मरणीय प्रवास आहे, हे नक्कीच. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तो भारताच्या तरुणाईचा आयडॉल बनला आहे शिवाय महान खेळाडूंच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे.
नीरज 13 वर्षांचा असताना तो एक अतिशय खोडकर मुलगा बनला होता. तो अनेकदा गावातील झाडांवर मधमाशांच्या पोळ्यांशी झगडत असे आणि म्हशींची शेपटी ओढत असे. मुलाला शिस्त लावण्यासाठी काहीतरी करावे असे त्याचे वडील सतीश कुमार चोप्रा यांना वाटत होते. त्यामुळे, बऱ्याच धडपडीनंतर, नीरजने ऍथलेटीक्समध्ये भाग घेण्याचे मान्य केले.
त्याच्या गावापासून सुमारे 15 किमी अंतरावर असलेल्या पानिपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये त्याचे काका नीरजला घेऊन गेले.इथेच तो भालाफेकीच्या प्रेमात पडला.
दोन वर्षांपूर्वी, नीरजचा भाला टोकियोच्या आसमंतात उंच उंच उडाला आणि भारताला पहिले-वहिले ऑलिम्पिक ट्रॅक आणि फील्डमधले सुवर्णपदक जिंकता आले. त्यावेळी तो केवळ 23 वर्षांचा होता. महान नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज दुसरा भारतीय ठरला होता. वर्ष 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या बिंद्रापूर्वी, भारताला ऑलिपिकमध्ये सुवर्णपदक फक्त पुरुष हॉकी संघाने मिळवून दिले होते. या पदकांची संख्या आहे आठ.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रविवारी नीरजने मिळवलेल्या सुवर्णपदकाने तो आता एका दंतकथेचा नायक बनण्याच्या मार्गावर आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये यापूर्वी त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. शिवाय या स्पर्धेमध्ये दोनदा पदके मिळवणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. शिवाय, एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारा बिंद्रा नंतर नीरज फक्त दुसरा भारतीय खेळाडू आहे. बिंद्राने 23 वर्षांचे असताना वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद आणि 25 व्या वर्षी ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले. आता नीरज 30 वर्षांचा होण्यापूर्वी त्याच्या हातात दोन ऑलिम्पिक आणि दोन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा असतील.
चोप्राची प्रेरणा उपयोगी…
ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी नुकतेच सांगितले की, नीरजच्या टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकामुळे भारतात क्रिकेटच्या पलीकडेही करिअर आहे, असे पालकांना वाटू लागले आहे. आज अर्धा डझनहून अधिक भारतीय सध्या 80 मीटरपेक्षा जास्त भाला फेकण्यास सक्षम आहेत.
नीरजसह तीन भारतीय रविवारी जागतिक अजिंक्यपद पुरुष भालाफेकीच्या अंतिम फेरीत सहभागी झाले होते. ज्या दिवशी नीरजने टोकियोमध्ये सुवर्णपदक जिंकले, तो 7 ऑगस्ट हा दिवस आता “राष्ट्रीय भाला दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे.