कोपरगाव – कोपरगाव ते येवलादरम्यान असलेल्या गावांना बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून, या मार्गावरील थांब्यांवर सर्व बसेसना थांबा द्यावा, अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. नितीन पोळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. ऍड. पोळ पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव ते येवलादरम्यान असलेल्या टाकळी फाटा, भास्कर वस्ती, येसगाव, आंचलगाव चौकी, पिंपळगाव चौकी व म्हसोबा चौकी या ठिकाणी काही वर्षांपूर्वी बऱ्याच बस थांबत होत्या. मात्र, आता या मार्गावर दिवसातून शेकडो बस जातात. मात्र, या ठिकाणी बसला अधिकृत थांबा नसल्यामुळे सध्या कोणत्याच बस थांबत नाहीत.
नाटेगाव, पिंपळगाव, येसगाव येथील अनेक मुले-मुली महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोपरगाव व येवला, तसेच एसएनडीटी महाविद्यालयात जातात. मात्र, बसला थांबा नसल्याने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मासिक पास सवलत असताना देखील कोणताही लाभ मिळत नाही. उलट मिळेल त्या खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो.
पूर्वी कोपरगाव ते येवलादरम्यान जनता बस सुरू होती, तसेच कोपरगाव आगाराची कोपरगाव-नाटेगाव बस होती. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही बस बंद आहे. एका बाजूला सरकार एसटी बसमध्ये महिलांना प्रवासात पन्नास टक्के सूट देत आहे, तर दुसऱ्या बाजूला या मार्गावर बस नसल्याने मुली व महिलांचे अतोनात हाल होत आहेत.
माजी मंत्री (कै.) शंकरराव कोल्हे परिवहनमंत्री असताना या स्थानकावर सर्व बसला थांबा देण्यात आला होता. मात्र, आता कोणताच लोकप्रतिनिधी या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे येवला-कोपरगाव मार्गावर दोन्ही बस आगारांनी जनता बस सुरू करावी अथवा लांब पल्ल्याच्या सर्व बसेसना थांबा द्यावा; अन्यथा या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा पत्रकाद्वारे ऍड. पोळ यांनी दिला आहे.