वाघोली : सोलापूर येथील सूरज जाधव या शेतकऱ्याने कृषी पंपाची वीज तोडल्या प्रकरणी आत्महत्या केली याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळात देखील उमटले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन तातडीने कृषी पंपाची वीज तोडणी बंद करावे याबाबतची सरकारकडे मागणी केली.
याच मागणीला आधारभूत मानून सोलापूर येथील मयत शेतकरी सूरज जाधव याच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी व सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे सुरज जाधव यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राज्य सरकार गुन्हा दाखल करावा ही मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन राज्याचे भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव गणेश कुटे, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव, जिल्हा उपाध्यक्ष शरद आव्हाळे यांच्या वतीने लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना देण्यात आले. राज्यातील चालू असलेली कृषी पंपाची वीज तोडणी थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गणेश कुटे यांनी दिला आहे.