लखनऊ – उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात माजी कॅबिनेट मंत्री आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीमुळे अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या प्रकरणाचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांची मुलगी भाजप खासदार संघमित्रा मौर्य म्हणाल्या की, त्यांच्या वडिलांवर भाजपच्या लोकांनी हल्ला केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या कुशीनगरमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीत सुमारे डझनभर वाहनांच्या काचा फुटल्या. भाजप कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप होत आहे. सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे समर्थक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारासाठी जात होते. खलवा पट्टी गावात ही घटना घडली. या घटनेनंतर सपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांनी रास्ता रोको करून निदर्शने केली.
गोदरिया बाजारमध्ये समर्थकांनी रास्ता रोको केला. यानंतर सपाचे उमेदवार स्वामी प्रसाद मौर्य घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी भाजप खासदार संघमित्रा मौर्यही घटनास्थळी पोहोचल्या. भाजप खासदार म्हणाल्या की, वडिलांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे, शांतता आणि दंगलमुक्त राज्याच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या उमेदवाराने आज वडिलांवर हल्ला केला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांना विजयी करून फाजीलनगरची जनता गुंडगिरीला उत्तर देईल. आम्हालाही इथे घेरले होते, आम्हाला पोलिसांनी वाचवले.
त्याचवेळी स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, निर्धारित मार्गावर रोड शो करत असताना भाजपच्या टोळक्याने माझ्यावर आणि ताफ्यातील वाहनांवर हल्ला केला. हिंसक तोडफोड, कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्लेही झाले. हा हल्ला भाजपच्या हतबलतेचे प्रतीक आहे. याचा मी तीव्र निषेध करतो, असे स्वामी प्रसाद म्हणाले. लाठ्या आणि हिंसाचाराने लोकशाही कमकुवत करता येत नाही, असेही ते म्हणाले.